नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने अपंग, निराधार, वृद्ध अशांना एक हजार रुपये मासिक आर्थिक सहाय्य देण्यात येते. परंतु मागील चार महिन्यापासून हे आर्थिक सहाय्य न मिळाल्याने दक्षिण नागपुरातील सावित्रीबाई फुले नगर निवासी लक्ष्मण सदाशिव गवई यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
लक्ष्मण गवई यांच्याकडे बीपीएलचे राशन कार्ड आहे. ते आपल्या मुली सोबत राहतात. यांना राजकमल चौकातील राशन दुकानातून महिन्याला 8 किलो तांदूळ व फक्त दोन किलो गहू मिळतात. 2 किलो गव्हामध्ये दोन लोकांनी महिनाभर कसे जगावे असा प्रश्न बसपा नेते उत्तम शेवडे यांनी केला आहे.
निराधारांना दर महिन्याला त्यांच्या खात्यात पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी गरजू जिल्हाधिकारी कार्यालयात नेहमी पायपीट करतात तसेच बँकेतही चकरा मारतात परंतु त्यांना निराशा मिळते. शासनाद्वारे राशन दुकानदाराकडून आवश्यक असलेले प्रत्येक व्यक्तीला 10-10 किलो गहू, तांदूळ मिळायला पाहिजे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज प्रत्येक व्यक्तीला गहू-तांदूळ 3+2 असे 5 किलो दिल्या जातात, अश्या प्रकारची गरिबांची थट्टा शासनाने थांबवावी असेही शेवडे म्हणाले.