कोंढाळी/काटोल :- नागपूर सह राज्यात सीसीआयची खरेदी बंद पडल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला असून खासगी बाजारात ही योग्य भाव नाही.अशी माहिती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली असून त्यांनी सांगितले की एकीकडे कापसाला भाव नसल्याने शेतकरी संकटात सापडला असून त्यातच गेल्या १५ दिवसापासून शासनाकडून सुरू असलेली सीसीआयची खरेदी बंद पडल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सीसीआयची खरेदी थांबल्यानंतर खासगी बाजारातील कापसाचे दर कमी होत असून सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख सह अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. महा विकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना कापसाला तेरा हजारांपर्यंत भाव मिळत होता. आता सरकारनेच हातवर केल्याचे चित्र आहे. सरकार लवकरात लवकर पुन्हा सी सी आय मार्फत कापुस खरेदी सुरू करून योग्य भाव देण्याची मागणी सुद्धा अनिल देशमुख यांनी केली आहे.
खासगी बाजारात कापसाला जेमतेम भाव मिळत आहे. खासगी बाजारात कापसाला केवळ ६२०० ते ६५०० रुपयांचे दर मिळत आहेत. काही ठिकाणी तर हे भाव ६ हजार रुपयांपर्यंत घसरले आहेत. अशा परिस्थितीत सीसीआयच्या केंद्रावर बऱ्यापैकी भाव शेतकऱ्यांना मिळत होता. मात्र, सीसीआयची केंद्र देखील बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
सीसीआयकडून मालाला गुणवत्तेचा निकष लावला जात असताना, जिल्ह्यात मात्र सरसकटपणे शेतकऱ्यांचा माल सीसीआयच्च्या केंद्रावर नाकारला जात आहे. त्यामुळे कापसाच्या गुणवत्तेचा मुद्दा पुढे करून, सीसीआयने एकप्रकारे खरेदीच बंद केल्याचे चित्र आहे. सीसीआयच्या केंद्रावर ८ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रता असलेल्या मालालाच हमीभाव एवढा दर दिला जात आहे. तर १३ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असलेला माल सरसकट नाकारला जात आहे. मात्र, हे निकष सीसीआय आपल्या मनाप्रमाणे लावत असल्याचा आरोप कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. सीसीआयच्या केंद्रावर देखील शेतकऱ्यांना पूर्ण हमीभावाचा दर यंदा मिळाला नसल्याचे ही अनिल देशमुख व कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
खासगी बाजारात कापसाची आवकच नाही…
एकीकडे सीसीआयचे केंद्र बंद असताना, खासगी बाजारात शेतकरी आपला माल आणतील अशी स्थिती होती. मात्र, खासगी बाजारात आधीच भाव कमी असल्याने खासगी बाजारात कापसाची आवकच घटली असल्याचे कापूस खरेदी करणारे व्यापारी सांगतात.