नागपूर :- कोल वॉशरिजमुळे विद्युत प्रकल्पांना शुध्द व स्वच्छ कोळसा मिळतो. त्यामुळे पर्यावरण प्रदुषित होणार नाही. त्यासोबतच शुध्द कोळसा मिळल्यामुळे विद्युत उत्पादन निर्मितीमध्ये बचत होणार असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
कन्हान जवळील गोंडेगाव कोल वॉशरिज भेट देवून पाहणी करतांना ते बोलत होते. आमदार आशिष जायसवाल, मॅगनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम.जे. प्रदीप चंद्रन, रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार सांगोळे, कोल वॉशरिजचे वरिष्ठ महाप्रबंधक वासुदेव गुरवे, देवशर्मा, संचालक अमित अग्रवाल, महाप्रबंधक प्रशांत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
गोंडेगाव येथील कोळसा कोल वॉशरिज मध्ये आणून त्याला शुध्द व स्वच्छ केले जाते. त्यामधील कार्बन मोनाक्साईड व नायट्रोजन वेगळे केले जात असल्यामुळे हा कोळसा पर्यावरण पुरक आहे, अशी माहिती देव शर्मा यांनी दिली. त्यासोबतच अपुऱ्या साठा असल्यास उमरेड कोळसा खाणीतून कोळसा मागवून त्यास शुध्द करुन तो महाजेनको कोराडी व खापरखेड्याला पुरविला जातो. येथील कोळसा शासकीय दरापेक्षा कमी दराने मिळतो, असेही यावेळी सांगितले.
खनिकर्म मंत्री दादा भूसे यांनी कोल वॉशरिजची पाहणी करुन तेथील प्रक्रियेबाबत माहिती घेतली. यावेळी कोल वॉशरिजच्या प्रकल्पाविषयी नकाशाची पाहणी केली.