नवी मुंबई :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे सुरू करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी वसतीगृहात ३१ जुलै २०२४ पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करावेत असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त मुंबई यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मुंबई विभागात मुंबई शहर ३, मुंबई विभागात मुंबई शहर 3, उपनगर ६, ठाणे ८. रायगड ७. पालघर १, रत्नागिरी १०, सिंधुदुर्ग ८ अशी एकूण ४३ वसतीगृहे कार्यरत आहेत. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता वसतीगृहासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी वसतीगृहातील प्रवेशासाठी संबंधित जिल्हयांच्या सहाय्यक आयुक्त, कार्यालय व संबंधित वसतीगृहाचे गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, मांग/मेहतर, भंगी इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गासह इतर प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाच्या क्षमतेनुसार पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सदर वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, मोफत जेवण व नाष्टा, शैक्षणिक साहित्य, क्रिडा साहित्य, स्पर्धा परीक्षा पुस्तके इ. उपलब्ध करून दिले जाते.
तरी, विद्यार्थ्यांनी मुंबई विभागातील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहिती घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.