संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– ग्रामीण भागातील विकासकामांचा खोळंबा,रिक्त पदे भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष
कामठी :- कामठी तालुक्यात 47 ग्रामपंचायतीचा समावेश असून या ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणाऱ्या ग्रामसेवकांची कामठी तालुक्यात 16 पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील गावगाडा कोलंमडला आहे.ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीतील महत्वाचे पद असून मागील काही वर्षापासुन ही पदे भरली नसल्याने गावातील विकासकामांचा खोळंबा होत आहे.
ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी लोकशाही संस्था व ग्रामविकासाचा कणा म्हणून ग्रामपंचायत ओळखली जाते.या ग्रामपमचायतीमध्ये ग्रामसेवक हे महत्वाचे पद मानले जाते. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव म्हणूनही ओळखले जाते.विविध कामे ग्रामसेवकामार्फत केली जातात त्यामुळे शासनामार्फत विविध प्रकारच्या विकास योजना या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येत असतात .मुलाच्या शिक्षणापासून ते रोजगार हमी योजना पर्यंतच्या सर्व योजनेकरिता ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक महत्वाचा दुवा असतात परंतु कामठी तालुक्यात ग्रामसेवकांची 16 पदे अजूनही रिक्त असल्याने अन्य ग्रामसेवकाना रिक्त जागावर अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे.त्यामुळे कामाचा ताण वाढल्याने नागरिकांच्या अनेक कामाचा खोळंबा होत आहे.
कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एकूण 47 ग्रामपंचायतीचा विचार केल्यास 31 ग्रामपमचायतीत नियमित ग्रामसेवकांची नियुक्ती केली आहे मात्र नेरी,सोनेगाव राजा, गादा,वारेगाव,भोवरी,नान्हा,जाखेगाव,उमरी, केम,सुरादेवी, रणाळा,आडका,खैरी,गुंमथी,भिलगाव,दिघोरी,खेडी,टेमसना,कढोली,तरोडी,लोंणखैरीला अतिरिक्त कारभार आहे.या अतिरिक्त कारभारामुळे गावातील विक्सकामावर मोठा परिणाम होत आहे याची बरेचदा ओरड होऊनही प्रशासन काहीच दखल घेत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
ग्रामसेवकांचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे ग्रामस्थांना लागणारे विविध दाखले वेळेत मिळत नसल्याने ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांची मोठी गौरसोय होत आहे.शिवाय गावांना वित्त आयोग तसेच दलित वस्तीसाठी लागणारा मिळणारा लाखो रुपयांचा निधी खर्च होण्यास विलंब होत आहे.ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो .ग्रामपंचायत मधील सर्व प्रकारचे अभिलेख जतन करणे ,सरपंचाच्या मदतीने विकासाची कामे पार पाडणे, विविध शासकीय योजना राबविणे,आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्यावत करणे,ग्रामसभा,मासिक सभा बोलावणे, त्यांच्या नोटिसा काढून संबंधितांना देणे,विविध कर वसूल करणे, जन्म मृत्यू विवाह नोंदी करणे,अशी अनेक कामे ग्रामसेवकाना करावी लागतात .अशा वेळी रिक्त पदे असलेल्या काही ग्रामपंचायतीचा विस्तार व कार्य मोठे असल्याने प्रभारी ग्रामसेवक प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही परिणामी नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. विकासकामे करताना अडचणी येतात त्यामुळे ग्रामसेवकांचा रिक्त पदाचा लवकरात लवकर भरणा करावा अशी मागणी जोर धरत आहे.