– दीक्षाभूमीवर बुद्ध, आम्रपाली लघुनाट्य
– ‘बुद्धं गच्छामि’च्या स्वरात दीक्षाभूमी निनादली
नागपूर :- जंगलात राहणारा अंगुलीमाल भीती दाखवून लोकांची बोटे कापायचा. बोटांची माळ तयार करून गळ्यात घालायचा. त्याची दहशत पाहून स्वत तथागत गौतम बुध्द त्यांच्याशी भेटायला जातात. धारदार शस्त्रासह तथागतांना मारण्यासाठी आलेला अंगुलीमाल कसा शांत होत बुद्धाला शरण जातो, नंतर तो बनतो आणि शेवटपर्यंत बुद्घाच्या संघात राहातो, असा हुबेहुब प्रसंग साकारण्याचा प्रयत्न कलावंतांनी केला. बुद्घ आणि अंगुलीमाल यांचा हा प्रसंग पाहून उपासक – उपासिका काही वेळासाठी शांत झाले. अडीच हजार वर्षापूर्वीच्या काळात गेल्याचा भास झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीच्या वतीने पवित्र दीक्षाभूमी येथे ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, १० ते शनिवार, १२ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. मुख्य सोहळा १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी प्रबुद्ध बागडे यांच्या सहकार्यांनी बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम सादर केला.
तसेच बुद्ध, आम्रपाली, अंगुलीमाल आणि माता रमाई यांच्यावर आधारीत नृत्य नाटक सादर बुद्धाची भूमीका प्रबुद्ध बागडे, अंगुलीमाल- रतन थुलकर, आम्रपाली- रोशनी मोलका तर रमाईची भूमीका तनू उके हिने साकारली. वैशाली राज्यातील प्रसिध्द असलेली आम्रमाली गौतम बुद्ध यांना भोजनाचे निमंत्रण द्यायला जाते आणि तथागत तिचे निमंत्रण स्वीकारतात. अखेर ती सुध्दा बुद्धाच्या चरणी जाते. यासह बुद्धाचा शांतीचा संदेश आणि माता रमाईचा त्याग हे हुबेहुब साकारण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भिक्खु संघ उपस्थित होता. यावेळी जापानचे अनुयायी, उपासक- उपासिका आणि विविध राज्यातून आलेल्या हजारो अनुयायांनी कलावंताची प्रसंशा केली.
जापानच्या अनुयायांसह पाच हजार उपासकांनी घेतली धम्मदीक्षा
पवित्र दीक्षाभूमीवर गुरुवारपासून धम्मदीक्षा सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी म्हणजे शुक्रवार ११ ऑक्टोबरला जापानच्या चाळीस अनुयायांसह पाच हजार बांधवांनी धम्मदीक्षा घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत धम्मदीक्षा देण्यात आली. बुद्धवंदनेनंतर ससाई यांनी विविध राज्यांतून आलेल्या उपासक, उपासिकांना धम्मदीक्षा दिली. उपासकांनी पंचशील केल्यानंतर २२ प्रतिज्ञांचे वाचन करण्यात आले. पहिल्याच दिवशी सातशेच्यावर उपासकांनी धम्मदीक्षा घेतली होती. मंचावर भदंत ससाई यांच्यासह भंते नागसेन, भंते प्रज्ञाबोधी, भंते नागवंश, भंते महानागा, भंते धम्मप्रकाश, भंते धम्मविजय, भंते नागवंश एस., भंते भीमा बोधी, भंते अश्वजित, धम्मशीला उपस्थित होते
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर १४ ऑक्टोबर १९५६ विजयादशमीला महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली होती. त्या दिवसाची आठवण म्हणून भदंत ससाई दरवर्षी धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित करतात. १० ते १२ ऑक्टोबरपर्यंत सलग तीन दिवस कार्यक्रम चालणार आहे.