यवतमाळ :- जिल्ह्यात गणेशोत्सव, दुर्गोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या उत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळांसह घरोघरी विद्युत रोषणाई केली जाते. अशी रोषणाई करत असतांना अपघात टाळण्यासाठी विद्युत जोडणी काळजीपुर्वक होणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्युत विभागाच्यावतीने सुरक्षात्मक सूचना जारी करण्यात आल्या असून त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये गणेश व गौरी उत्सव आनंद व उत्साहाने सुरु झाला आहे. येत्या काळात शहरात दुर्गोत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे. या उत्सवात भव्य देखावे, आकर्षक मुर्ती, रोषणाई व मिरवणूक सोहळा बघण्यासाठी भक्तगणांची मांदियाळी असते. आनंदोत्सव साजरा करीत असतांना कोणताही अपघात घडू नये यासाठी रोषणाई, मंडप, घरातील सजावटीमध्ये करण्यात येणाऱ्या विद्युत जोडणीबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.
विद्युत सुरक्षितता सामायिक जबाबदारी असून प्रत्येकाने संभाव्य धोक्याबद्दल जागरूक राहून आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे. त्याकरीता विद्युत निरीक्षकांनी सुरक्षा सूचना जारी केल्या आहे. मंडप उभारणी करताना वीज वाहिनीपासून सुरक्षित अंतरावर उभारणी करण्यात यावी. वीज जोडणीचे वायर्स, केबल्स इन्सुलेटेड असावे. जॉईंन्टस् इन्सुलेशन टेपद्वारे सुरक्षित करावे. वायर्स, केबल्स गरम होवून शॉर्ट सर्कीट टाळण्याकरीता, योग्य आकार व दर्जाचे वायर्स वापरावे.
एकाच सॉकेटवर अनेक दिवे किंवा उपकरण जोडून सर्कीट ओव्हरलोड करू नये. चांगल्या दर्जाची आयएसआय प्रमाणित विद्युत उपकरणे, स्वीच गिअर्स, वायर्स, स्वीच सॉकेट वापरावे. लिकेज विद्युत प्रवाह स्वयंचलितपने बंद करण्यासाठी ३० एमए आरसीसीबीचा वापर करावा. विद्युत संचमांडणीस योग्य अर्थींग करावे. सर्व विद्युत कनेक्शन पाऊस व पाण्यापासून संरक्षित असल्याची खात्री करावी. अग्निशामक यंत्रे कार्यान्वित ठेवून आपत्कालीन परिस्थितीत वापर करावा.
वीज जोडणीचे काम शासनमान्य परवानाधारक इलेक्ट्रीशियन व कंत्राटदारकडून करून घेण्यात यावे. वीज जोडणी अधिकृत घ्यावी, वीज चोरी किंवा अनधिकृत आकोडे टाकून वीज वापर करू नये. प्रकाश व्यवस्था, सिरीज लावतांना ते लोखंडी आधारावर न लावता, लाकडी बांबू, खांबावर लावावे, असे उद्योग, उर्जा, खनिकर्म व कामगार विभागाचे विद्युत निरिक्षक अ.प्र.देशमुख यांनी कळविले आहे.