नागपूर :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे आज नागपुरात शुभारंभ झाले. महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने व नागपूर महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने रेशीमबाग येथील मैदानात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हजारोच्या संख्येत ‘लाडक्या बहिणींनी’ उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात उपस्थित भगीनींसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी ठेवण्यात आली होती.
सुप्रसिद्ध गायीका वैशाली सावंत यांची बहारदार गाण्यांची प्रस्तुती आणि ‘हास्य जत्रा’ फेम नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकरांची जुगलबंदी महिला भगीनींनी चांगलीच ‘एंजॉय’ केली. वैशाली सावंत यांनी स्टेजवर येताच त्यांचे गाजलेले गीत ‘ऐजा दाजीबा….’ सादर करताच संपूर्ण सभापंडात भगिनींनी हातवारे करुन दाद दिली आणि ठेका धरला. पुढे वैशाली सावंत यांनी ‘गुलाबाची कळी बघा हळदीनं माखली’, ‘खेळू झिम्मा’ यासह ‘हात नका लावू माझ्या साडीला’ ही लावणी तसेच ‘नको मारू कान्हा…’ ही गवळण, गोंधळ, ‘जत्रा’ फेम ‘कोंबडी पळाली…’ यासोबतच गणेशोत्सवात लाँच होणारे त्यांनी श्रीगणरायावरील नव्याकोऱ्या गाण्याचे सादरीकरण केले. तर त्यापूर्वी ‘हास्य जत्रा’ फेम नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकरांची यांनी संपूर्ण मंचाचा ताबा घेतला. सभामंडपात रॅम्पवरुन फेरफटका मारून भगीनींशी संवाद साधला. त्यांच्याकडून उखाणा, डान्स करवून घेत पैठणी भेट दिली.
कार्यक्रमात ‘लाडक्या बहिणींची’ हाऊसफुल्ल गर्दी झाल्यानंतर कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये देखील व्यवस्था करण्यात आली. भगिनींनी कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये लाईव्ह कार्यक्रमाचा आनंद लुटला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे आमोद आणि श्यामल देशमुख यांनी केले.
मराठमोळ्या थाटात लाडक्या भावांचे स्वागत
नागपुरातील ‘लाडक्या बहिणींनी’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या लाडक्या भावांचे मराठमोळ्या थाटात स्वागत केले. फेटे बांधून मंडपात उपस्थित भगिनींनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मंडपात आगमन होताच त्यांना राखी बांधली. या भावंडांनीही लाडक्या बहिणींवर पुष्पवर्षाव केला. मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, कृपाल तुमाने, कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, टेकचंद सावरकर, समीर मेघे, आशिष जयस्वाल आदी उपस्थित होते.
उत्कृष्ट आयोजनासाठी प्रशासनाचा सन्मान
लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभ प्रसंगी भव्यदिव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांना प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित केले.
भगिनींच्या येणे-जाण्याची विशेष काळजी
रेशीमबाग येथे कार्यक्रमस्थळी येण्यासाठी मनपाद्वारे ‘आपली बस’ची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाला घेऊन आल्यानंतर त्याच बसमधून सुरक्षितरित्या भगिनींना घरी देखील परत सोडण्यात आले. बसमध्ये भगिनींकरिता पाणी तसेच नाश्त्याचे व्यवस्था देखील करण्यात आली होती. रेशीमबाग मैदानातून प्रत्येक भगिनीला सुरक्षितरित्या घरी सोडले जावे याकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, परिवहन व्यवस्थापक गणेश राठोड, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त प्रकाश वराडे यांनी लक्ष दिले. सर्व भगिनींना सुखरूप घरी सोडल्यानंतरच सर्व अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळ सोडले.