पुणे :-ऑलिम्पिकपटू वीरधवल खाडेचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या जलतरण संघास राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरीची अपेक्षा आहे. वॉटरपोलो डायव्हिंग, ट्रायथलॉन, मॉडर्न पेन्टॅथलॉन या क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राला चांगले यश मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांनी व्यक्त केला.जलतरणाच्या विविध क्रीडा प्रकारांमध्ये वीरधवल खाडे, पलक जोशी, भक्ती वाडकर, सेजल मानकर यांच्यावर महाराष्ट्राची मोठी मदार आहे. त्याचप्रमाणे पुरुष व महिला गटातील रिले शर्यतीतही महाराष्ट्राचे खेळाडू पदक मिळतील अशी आशा आहे. आजपर्यंत झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व खेलो इंडिया स्पर्धांमध्ये महाराष्ट्राला जलतरणांमधील पदकांनी मोठा हातभार लावला आहे.
गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील डायव्हिंग या प्रकारात आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋतिका श्रीरामने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. गोव्यातही तिला वर्चस्व गाजवण्याची संधी आहे. तिच्याबरोबरच तुषार गिते, आदित्य श्रीराम यांच्याकडूनही पदकांची अपेक्षा आहे.
वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्र संघाला पुरुष व महिला या दोन्ही गटात पदक मिळवण्याची खात्री आहे.
ट्रायथलॉनमध्ये मानसी मोहिते, संजना जोशी यांच्यावर महाराष्ट्राची भिस्त आहे तर मॉडर्न पेन्टॅथलॉनमध्ये मयंक चाफेकर पार्थ मिरगे, अंगद इंगळेकर व डॉली पाटील यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.