– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन
नागपूर :- सद्यस्थितीत नागपूरची ओळख आयटी हब, हेल्थ हब आणि एव्हिएशन हब म्हणून आहे. पण यासोबतच स्किल हब म्हणूनही नोंद होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन नागपूर जिल्ह्यात कौशल्य विद्यापीठ (स्किल युनिव्हर्सिटी) उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पीएम विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन झाले. भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त द्वारका (नवी दिल्ली) येथील नवनिर्मित यशोभूमी सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नागपूरकरांनी स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात थेट प्रक्षेपणाद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी केंद्रीय मंत्री ना. गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार कृष्णा खोपडे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, एमएसएमईचे संचालक प्रशांत पार्लेवार, वेकोलीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ना. गडकरी यांनी विदर्भातील कारागिरांनी नवतंत्रज्ञानाकडे वळण्याची गरज असल्याचे मत मांडले. ते म्हणाले, ‘विणकाम, सुतारकाम आदी कौशल्याची कामे ही निर्यात प्रक्रियेत महत्त्वाची अशी भूमिका पार पाडत आहेत. पण नवीन तंत्रज्ञान, डिजीटल सिस्टीमचा वापर, मार्केटिंग आदींचे प्रशिक्षण या कारागिरांना मिळणे गरजेचे आहे. निर्यात वाढली तर रोजगारही वाढेल. त्यामुळे या सर्व बाबींचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्यावर आधारित विद्यापीठाची गरज आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात चारशे एकरपर्यंत जागा उपलब्ध झाल्यास ते प्रत्यक्षात साकारता येईल. सिम्बॉयसिस, आयआयएम, लॉ स्कूल या धरतीवर कौशल्य विद्यापीठाची निर्मिती करण्यासाठी राज्य सरकार नक्कीच पुढाकार घेऊ शकेल.’ विश्वाची निर्मिती करणारे भगवान विश्वकर्मा यांच्याप्रमाणेच देशातील १२ बलुतेदारांनी पारंपारिक कौशल्य जपून त्याला नवीन तंत्रज्ञानाचा आधार दिला तर पीएम विश्वकर्मा योजनेमार्फत नवीन उद्योग युगाची सुरुवात होईल, असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला.
देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक म्हणून बारा बलुतेदारांना विशेष असे महत्त्व आहे. या बलुतेदारांनी गाव गाड्यांचे अर्थकारण सांभाळून देशाची आर्थिक परिस्थिती सुस्थितीत ठेवली. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत १८ विविध व्यवसाय निवडण्यात आले असून या योजनेतून कौशल्य प्रशिक्षण टुलकीट, तीन लाखांचे कर्ज अशा विविध सुविधा देऊन नवीन पद्धतीने व्यापार करण्यास चालना देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.