नागपूर :- विदर्भ आणि नागपुरात कल्पनांचा, सर्जनशीलतेचा, अविष्काराचा दुष्काळ नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ‘व्हिजन नेक्स्ट’च्या वतीने, राज्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या पेटंट फेस्टला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून साडेसहाशेहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.
वैदर्भीयांच्या कल्पकतेला संधी देण्यासाठी ‘व्हिजन नेक्स्ट’ने पेटंट फेस्ट या महोत्सवाचे आयोजन केले आहे. ज्यांना पेटंट मिळाले त्यांच्यासाठी ‘पेटंट फेस्ट’ आणि ज्यांच्याकडे वैशिष्टपूर्ण कल्पना आहेत, ज्या अमलात आणल्या तर समाजाचे भले होऊ शकते अशांच्या अभिनव कल्पनांसाठी ‘आयडीया फेस्ट’ अशी योजना करण्यात आली होती. त्यासाठी ५ ऑगस्ट पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी शंभराहून अधिक कॉलेजला भेटी दिल्या, साठ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला, पाच हजार शिक्षकांच्या भेटी घेतल्या. पहिल्यांदाच होणाऱ्या या महोत्सवासाठी ६५० हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. हा एक विक्रम आहे.
प्राप्त पेटंट आणि कल्पना यांची छाननी करण्यासाठी ८० हून अधिक प्रतिष्ठित तज्ज्ञ परिक्षकांची नियुक्ती केली आहे. पेटंट धारकांचे परीक्षण येत्या ८ ऑगस्ट रोजी तर कल्पनांचे परीक्षण येत्या १० ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. यातील यशस्वी स्पर्धकांचा येत्या १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सुरेश भट सभागृहात सन्मान केला जाणार आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना पाच लाखांची बक्षीसे वितरीत केली जाणार आहेत. ही बक्षीसे वेदिक : सेंटर फॉर स्किल अँड इंटरप्रेन्युअरशिप इन एअरोस्पेस अँड डिफेन्स यांच्या वतीने प्रायोजित करण्यात आली आहेत. ज्यांच्या नावे दहापेक्षा अधिक पेटंटची नोंद आहे, त्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. ज्या कॉलेजमधून सर्वाधिक प्रवेशिका प्राप्त होतील अशा पाच कॉलेजचा देखील सन्मान केला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे.
पीआर टाईम्स आणि ‘एनलायटन द सोल’ यांच्या सहकार्याने होत असलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची प्रेरणा निर्माण होईल. नित्य नूतन शोधांची भावना तयार होईल. यातील काही कल्पना समाजाच्या भल्यासाठी कारणीभूत ठरतील अशी अपेक्षा आहे.