– सीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परिषद
नागपूर :- चार्टर्ड अकाऊंटंट्सचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान महत्त्वाचे आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रामधील विकासाचा दर वाढणे, देशात आर्थिक व्यवहार्यता (इकॉनॉमिक व्हायबिलिटी) वाढीस लागणे आणि रोजगाराच्या शक्यता निर्माण होण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंट्सची भूमिका महत्त्वाची मानली जाते. ते भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स आफ इंडियाच्या वतीने वनामतीच्या सभागृहात आयोजित सीए विद्यार्थ्यांच्या परिषदेला नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सीए जयदीप शहा, संजय एम. अग्रवाल, संजय सी. अग्रवाल, स्वरुपा वझलवार, दिनेश राठी, अक्षय गुल्हाने, अभिजित केळकर, पिंकी केडिया, अर्पित काबरा, उमेश शर्मा, मंगेश किनारे यांची प्रमुख उपस्थिती होती. नितीन गडकरी म्हणाले, ‘या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मेरीटमध्ये येण्याचा प्रयत्न करावाच. पण, जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करण्यावर अधिक भर द्यावा. या व्यवसायात करियर करताना कायद्याचा सन्मान करणे, पारदर्शकता राखणे, टीम वर्कवर भर देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकारात्मकता आणि अहंकार यात अंतर ठेवणे या गोष्टी आवर्जून करायला हव्या.’ कुठल्याही कागदावर विचार करून स्वाक्षरी करा. स्वाक्षरी करण्यापूर्वी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करा. कारण पुढे अडचणी उभ्या झाल्यास स्वाक्षरी करणाऱ्यालाच सर्वांत पहिले दोषी ठरविले जाते, असा मोलाचा सल्लाही गडकरी यांनी दिला.
परफॉर्मन्स ऑडिट जास्त महत्त्वाचे
तुम्ही सारे फायनान्शियल ऑडिटच्या क्षेत्रात आहात. ते अत्यंत महत्त्वाचे आहेच. पण, संस्थेच्या आणि व्यक्तिगत पातळीवर परफॉर्मन्स ऑडिटही होणे जास्त गरजेचे आहे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. आपल्या कामातून देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंट्सने आऊट ऑफ बॉक्स विचार करण्यावर भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
शालीनता बाळगा
कुठल्याही क्षेत्रात शिकण्याची प्रवृत्ती आणि मानवी स्वभाव या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. स्वभावातील शालीनता इतरांचा सन्मान करून वाढत असते. आपल्याला महानायक अमिताभ बच्चन यांच्या स्वभावावरून हे शिकायला मिळते. आपणच सर्वांत हुशार आहोत, ही भावना प्रगतीच्या आड येते. त्यामुळे शालीनता बाळगून आपल्या कामातील गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.