संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 206 कोटी रुपये मंजूर असून व आठ वर्षाच्या काळ लोटून सुद्धा पुनर्वसन कामाला सुरुवात नाही
– ओपन कास्ट खदानच्या ब्लास्टिंग मुळे अनेक घरांना गेले तडे, गावकऱ्या मध्ये भीतीचे वातवरण
कामठी :- कामठी तालुक्यातील बिना संगम येथे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या वतीने सन 2014 मध्ये ओपन कास्ट खदान सुरू केली असून लवकरच या बिनासंगम गावाचे पुनर्वसन करन्यात येणार असल्याचे सांगितले होते परंतु आता आठ वर्षाचा काळ लोटून सुद्धा पुनर्वसन च्या कोणत्याही कामाला सुरुवात झाली नाही . बिनासगम गावाला लागून ओपनकास्ट खंदानच्या ब्लास्टिंग मुळे बिनासंगम गावातील अनेकांच्या घराला तडे जावून भीतीला भेगा गेल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिनासंगम गावाचे त्वरित पुनर्वसन करण्याची मागणी बिना ग्रा प चे उपसरपंच हरीश गजभिये व गावातील नागरिकां केली आहे.
कामठी तालुक्यातील बिनासंगम येथे मोठ्या प्रमाणात कोळशाचा साठा असल्यामुळे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या वतीने सन 2014 मध्ये 170 शेतकऱ्यान कडून 325 हेक्टर जमीन संपादित करून ओपन कास्ट खदान सुरू करून मोठ्या प्रमाणात कोळसा काढण्याचे सुरू आहेत. शेतकऱ्यांकडून जमीन संपादित करतांना पडीत जमीन 6 लाख, कोरडवाहू जमीन 8 लाख, तर ओलिताची जमीन 10 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे जमिनीचा मोबदला व 8 अ नुसार कुटुंबातील एका सदस्यला वेस्टर्न कोलफिल्ड इंडिया लिमिटेडमध्ये स्थायी नोकरी देण्याचा करार करण्यात आला होता .त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी सुद्धा देण्यात आली आहे. बिना गावातील नागरिकांचे घराचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणार असून नवीन पुनर्वसन जागेवर शेतकरी कुटुंबात तीन हजार चौरस फुटाचा प्लॉट तर बिना शेतकरी नागरिकास पंधराशे चौरस फुटाचा प्लॉट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . सण 2017 मध्ये राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेत बिना संगम गावाच्या पुनर्वसना करिता खापरखेडा – कामठी मार्गावरील बिना टी पॉईंट भाणेगाव परिसरातील कोलार नदी काठाने शिवारात शासनाच्या वतीने 44 हेक्टर जमिनीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.पुनर्वसन जागेवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या वतीने 84 कोटी रुपये तर उर्जा विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने 122 कोटी रुपये असा एकूण 206 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच पुनर्वसन च्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले होते पुनर्वसन कामाच्या साठी जमीन संपादित करण्याच्या कामाला सुरुवात झाली होती परंतु सन 2019 मध्ये राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यामुळे पुनर्वसन च्या कामाला ब्रेक लागले असून पुनर्वसन चे काम थंडबस्त्यात पडले होते. बिनासंगम गावाच्या पुनर्वसनासंदर्भात गावातील काही नागरिक राज्याचे तत्कालीन क्रीडा मंत्री सुनीलबाबू केदार यांना भेटले असता त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे उपस्थितीत वेस्टर्न कोलफिल्ड, ऊर्जा विभाग ,नागपूर जिल्हा विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्वरित बिनासंगम गावाच्या पुनर्वसन च्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले होते परंतु कोणत्याही पुनवर्सन च्या कामाला सुरुवात झाली नाही. दरम्यान महाविकास आघाडी सत्तेकाळात या क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांनी तत्कालीन पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदित करून बिना गावाच्या पुनर्वसनाची मागणी केली होती तर आता खुद्द भाजप सत्तेत सहभागी असल्याने या क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर पुढाकार घेऊन बिना गावातील उपेक्षितांना न्याय मिळवून देतील का?असाही प्रश्न येथील उपसरपंच हरीश गजभिये यांनी केला आहे.
बिना संगम गावाला लागून ओपन कास्ट खदाणीत होत असलेल्या ब्लास्टिंग मुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून केव्हाही मोठ्या प्रकारची जीवितहानी सह मोठ्या प्रकारची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बिना संगम गावाचे पुनर्वसन त्वरित करण्याची मागणी उपसरपंच हरीश गजभिये सह गावातील समस्त जागरूक नागरिकांनी केली आहे.