संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कृषी विभागाला रिक्त पदांचे ग्रहण ,कामाचा उडताहेत बोजवारा
– मागील दोन महिन्यापासून तालुका कृषी अधिकारी पद प्रभारी स्वरूपातच
कामठी :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कामठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला रिक्त पदाचे ग्रहण अजूनही कायम असून कामठी तालुक्यातील एकूण 77 गावाचा भार केवळ 14 कृषी सहाय्यक सांभाळत आहेत त्यातच कामठी तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत यांची मागील जून महिन्यात पदोन्नतीने इतरत्र बदली झाली मात्र त्यांच्या रिक्त ठिकाणी कायमस्वरूपी अजूनही कुणाची बदली करण्यात आली नसल्याने मागील दोन महिन्यांपासून हे पद अजूनही प्रभारी स्वरूपात आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नसल्याची ओरड अजूनही कायम आहे ज्यामुळे कामाचा बोजवारा उडत आहे.
कामठी तालुक्यातील कृषी विभागाचा कारभार सांभाळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कामठी तहसील कार्यालयात कार्यरत आहे.परंतु प्रत्यक्ष गावात जाऊन योजनांची माहिती,प्रचार, प्रसार आणि शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कृषी सहाय्यकांची उणिवा जाणवत आहे.कामठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा कारभार काही दिवस कृषी अधिकारी विजय नंदनवार यांच्याकडे प्रभारी स्वरूपात होता त्यानंतर हिंगण्याचे तालुका कृषी अधिकारी प्रभारी स्वरूपात पदभार सांभाळत आहेत.येथील तालुका कृषी कार्यालयात एकूण 50 पदे मंजूर असून त्यापैकी 20 पदे रिक्त आहेत.तालुका कृषी अधिकारी ,मंडळ कृषी अधिकारी ,कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाय्यक,सहाययक अधीक्षक,वरिष्ठ लिपिक, वाहनचालक ,शिपाई असे एकूण 50 पदे मंजूर आहेत त्यातील 30 पदे भरले असून 20 पदे अजूनही रिक्त आहेत.यामध्ये विशेषतः एकूण 24 कृषी सहाय्यकांची मंजूर पदेपैकी 10 पदे अजूनही रिक्त आहेत.2 लिपिक पदे रिक्त आहेत ,वाहनचालक पद रिक्त आहे तसेच 3 शिपाई पदे रिक्त आहेत. या रिक्त पदाचा भरणा होत ,नसल्यामुळे शेतकऱ्याचे कामे वेळेवर होत नसून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ वेळेवर मिळत नसल्याची खंत आहे.
कामठी तालुक्याची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे.परंतु योजना राबविणारे अधिकारी आणि कर्मचारी पुरेसे नसल्यामुळे शेतकऱ्यांची ओरड सुरु झाली आहे.कार्यरत कर्मचाऱ्यावर अतिरिक्त ताण पडत आहे.ज्याकडे येथील लोकप्रतिनीधी व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना कृषी विषयक योजनांचा लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे.