संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषदच्या पंचवार्षिक निवडणुका या गेल्या दीड वर्षांपासून न्यायालयिन प्रक्रिया,प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण अशा अनेक तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर पडल्या आहेत.
मात्र अद्यापही या निवडणुका होण्याचे चिन्ह दिसून येत नसून पावसाळ्या नंतर निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.पावसाळ्यात या निवडणुका घेणे शक्य नसल्याने या निवडणुका ऑक्टोबर ,नोव्हेंबर मध्ये झाल्यास तब्बल दोन वर्षे निवडणुका लांबणीवर पडल्याने यामध्ये विविध राजकीय पक्षाच्या आजी-माजी भावी इच्छुकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जो कामाचा सपाटा लावला होता त्याला काही ठिकाणी ब्रेक लावल्याचेही आता पहावयास मिळत आहे.
कामठी नगर परिषद मध्ये मागील 15 महिन्यापासून प्रशासक राज सुरू आहे.कामठी नगर परिषद मध्ये नगरसेवक म्हणून आपली वर्णी लागावी यासाठी सर्वच पक्षातील आजी माजी भावी इच्छुकांनी आपापल्या परीने जनसंपर्क वाढवून कामाचा सपाटा लावला होता मात्र ओबीसी आरक्षण लागू करण्यात यावे याकरिता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आठ महिन्याचा कालावधी गेला अशा विविष कारणामुळे निवडणूक रखडल्या.पावसाळा तोंडावर आला असल्याने पावसाळयात निवडणुका घेणे शक्यच नसल्याने ऑक्टोबर,नोव्हेंबर नंतरच म्हणजेच दोन वर्षानंतर या निवडणुकीचा मुहूर्त निघू शकेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.