बेला :- पंचक्रोशीतील प्रख्यात संत बालयोगी परमहंस रामचंद्र महाराज यांचा अकरावा पुण्यस्मरण व समाधी सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला. तीर्थक्षेत्र कडाजना येथून आलेल्या विलोभनीय भव्य पालखी, टाळ मृदंगाच्या निनादात भजनी दिंड्यांनी संतभूमी बेला नगरी अक्षरशः दुमदुमून गेली. अखंड हरिनामाच्या धार्मिक सप्ताहाला सुद्धा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बालयोगी रामचंद्रबाबा यांची बेला ही जन्मभूमी आहे. परंतु त्यांनी बेला लगतच्या वेना नदी काठावरील कडाजना टेकडीवर वास्तव्य करून तप,साधना केली. त्यामुळे महाराजांच्या पदस्पर्शाने बेला व कडाजना पुण्य, पावनभूमी ठरली. टेकडीच्या पायथ्याशी कधीही न आटणारा विशाल डोह आहे. नदीचे विस्तीर्ण व खडकाळ पात्रातून खळणारा पाण्याचा प्रवाह व हिरवागार रम्य,निसर्ग भाविक व पर्यटकांना खुणावतो. महाराजांवर अपार श्रद्धा असणारे विदर्भातील हजारो भक्तगण येथील विविध धार्मिक कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावतात. महाराष्ट्र शासनाने या तीर्थक्षेत्राला क दर्जा प्रदान केला आहे.
20 सप्टेंबर पासून कडाजना आश्रमात अखंड हरिनामाचा जप सुरू झाला. विविध भजन मंडळांनी आपापले संगीतमय भजन, ज्ञानेश्वरी पारायण व हरिपाठ नित्यनेमाने पार पडले. श्री पुंडलिक वरदा अध्यात्मिक ट्रस्टच्या वतीने येथे वर्ग तिसरी ते सातव्याच्या मुलांना अध्यात्मिक शिक्षण देण्यात येते. यंदा ट्रस्टचे पदाधिकारी ह.भ.प. प्रकाश महाराज चंदनखेडे यांनी गोपालकाल्याचे सुश्राव्य कीर्तन केले. त्यामुळे उपस्थित असंख्य भाविक मंत्रमुग्ध झाले. पालखी दिंडी सोहळ्यात खेड्यापाड्यातील अनेक भजनी मंडळांच्या दिंड्या सहभागी झाल्या होत्या. बेला येथील गणेश महिला भजन मंडळाच्या नलू धोंडबा डुकरे, संगीता महाकाळकर, सविता हरी रोडे, सुनिता उरकुडे, चंदा बालपांडे, संघमित्रा भागवते, बेबी हजारे, दुर्गा तेलरांधे, रंजना भुसारी, पुरुषोत्तम श्रीराम उरकुडे, हरीश महादेव हिंगे, रत्नमाला हिंगे, मनीषा भुसारी, जोशना भुसारी, रत्नमाला हरी हरदेव, पंचफुला भुसारी,योगिता भागवते, संगीता तेलरांधे आदींनी दिंडीत एकापेक्षा एक सरस भजने गायली. समाधी सोहळा व हरिनाम सप्ताहाचे यशस्वीतेसाठी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष दिलीप मुळे, वसंतराव मुठाळ, देवराव नरड, गजानन दौलतकर, यादवराव मुठाळ, अरुण बावणे, तुकाराम काळबांडे व असंख्य भक्तांनी अथक परिश्रम घेतले.