रांची :-काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे, त्यांनी सोमवारी रांची येथे बोलताना केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार आल्यास देशातील जातीनिहाय जनगणना केली जाईल आणि आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल अशी घोषणा केली आहे.
रांची येथील शहीद मैदानावर झाल्याल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आयोजित रॅलीला संबंधित करताना राहुल गांधी यांनी हे आश्वासन दिलं आहे. राहुल गांधी यांनी यावेळी भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका देखील केली.
माजी काँग्रेस अध्यक्ष राहिल गांधी म्हणाले की जाती जनगणना करण्याची मागणी होत आहे आणि ओबीसी, दलित आणि आदिवासींना अधिकार देण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान म्हणतात की कोणतीही जात अस्तित्वात नाही, मात्र जेव्हा मतं मागण्याची वेळ येते तेव्हा पंतप्रधान म्हणतात की ते ओबीसी आहेत.
नरेन्द्र मोदी म्हणतात की ते ओबीसी आहेत, परंतु जेव्हा जातीनिहाय जनगणनेची मागणी केली की ते सांगतात की फक्त दोन जात आहेत- गरीब आणि श्रीमंत, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
राहुल गांधी यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या सभेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी म्हणातात की, आजकाल ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण मिळू शकत नाही. हे पन्नास टक्क्यांच लिमीट काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं सरकार काढून फेकून देईल असे राहुल गांधी म्हणाले.
जे दलित, आदिवासी आहेत त्यांच्या आरक्षणात कुठलीही कमतरता येणार नाही, याची मी गॅरंटी देतो, मागास घटकांना त्यांचा अधिकार मिळेल, असेही राहुल गांधी म्हणाले. हा देशातील सर्वात मोठा प्रश्न आहे. दलित, आदिवासी यांना बॉडिंग लेबर बनवलं जात आहे. मोठ्या कंपन्यात, रुग्णालयात, कोर्टामध्ये, शाळा महाविद्यालयात यांची कुठलीच भागिदारी नाहीये असेही राहुल गांधी म्हणाले. आमचं पहिलं पाऊल जातनिहाय जनगणना करणे हे असेल असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.