– सरकारकडून युवक कॉंग्रेसच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची दखल
नागपूरः राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवरुन ये-जा करणाऱ्या वाहन चालकांकडून प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) चेक पोस्टवर काही भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून गाव गुंडांना हाताशी धरुन अवैध वसुली करण्यात येत होती. शेकडो वाहन चालकांकडून तक्रार प्राप्त झाल्यावर युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्वात मनसर येथील आऱटीओच्या चेक पोस्टवर आंदोलन करण्यात आले. यावेळी अवैध वसुली करणाऱ्यांबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारल्यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन आंदोलकांवर आयपीसीच्या 353 आणि 34 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले होते. याची तक्रार राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही बंटी शेळके यांनी मुंबईत जाऊन लिखीत स्वरुपात तक्रार दिली होती. याची दखल घेत राज्य सरकारकडून राज्यभरातील चेक पोस्टबाबत समिती स्थापन करण्यात आली. राज्य सरकारच्या या कृतीचे स्वागत युवक कॉंग्रेसकडून करण्यात आले असून भ्रष्टअधिकाऱ्यांची सीआयडी मार्फत चौकशी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नसल्याचे शेळके यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारक़डून 26 एप्रिल 2022 रोजी चेकपोस्ट बाबत राज्याचे परिवहन आय़ुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चार इतर सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तपासणी नाके बंद करण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणे तसेच यामुळे राज्याच्या महसूल वर होणाऱ्या परिणामाबाबत तीन महिन्यांत अहवाल सादर करावा लागणार आहे.![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2022/04/IMG-20220428-WA0011-1.jpg)
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2022/04/IMG-20220428-WA0011-1.jpg)
खासगी लोकांकडून वसूली
वाहन चालकाकडे संपूर्ण कागदपत्रेही असले तरीही 1500 ते 2000 रुपये दमदाटी करुन गुंडांकडून वसूल करण्यात येत होते. ट्रक चालकांनी विरोध केल्यावर या टोळ्याकडून अनेकांना मारहाण करण्यात आल्याचेही ट्रक चालकांनी आंदोलन स्थळी सांगितले. तसेच याचे लाईव्ह व्हिडीओ देखील फेसबुकवर टाकण्यात आले होते. ट्रक चालकांकडून पैसे वसूल करणारे हे खासगी लोक कोण आहेत? यांना वसूलीचे अधिकार कोणी दिले आदी प्रश्न संबंधीत अधिकाऱ्यांना विचारल्यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच एका अधिकाऱ्याला स्थानिक पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली होती.
एसीबीकडे ही तक्रार
या भ्रष्ट अधिकाऱ्यांबाबत युवक कॉंग्रेसच्यावतीने नागपूरच्या एसीबी अधिक्षकांकडेही लिखित स्वरुपात तक्रार नोंदविण्यात आली. तसेच या भ्रष्ट अधिकारी, त्यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीय यांच्या संपत्तीचीही चौकशीची मागणी करण्यात आली होती.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे ही तक्रार
महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेस घटक पक्ष असतानाही भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलला म्हणून युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडेही करण्यात आली होती हे विशेष. याशिवाय नागपूर दौऱ्यावर असलेल्या युवक कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती.