Ø ग्राहकांच्या तक्रारींची वेळीच दखल घ्या
Ø नादुरुस्त विद्युत रोहीत्रे तातडीने बदला
यवतमाळ :- कृषीपंपधारक शेतकरी आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी आज वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. कृषी पंपांसह ग्राहकांना सुरळीत आणि योग्य दाबाचा वीज पुरवठा द्या, अशा सूचना त्यांनी बैठकीत केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रविण दरोली, कार्यकारी अभियंता ब्रजेश गुप्ता, दारव्हाचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, उपविभागीय अभियंता दिपक रापर्तीवार, राठोड आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवठा अतिशय महत्वाचा आहे. परंतु काही ठिकाणी पुरवठा नियमित आणि योग्य दाबाने होत नसल्याने सिंचनावर त्याचा परिणाम होतो. दारव्हा व नेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी याबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. बैठकीला शेतकरी देखील उपस्थित होते. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य वीज ग्राहक देखील नियमित वीज पुरवठ्याबाबत सातत्याने तक्रारी करत आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत होणे आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांनी बैठकीत निर्देश दिले.
रोहीत्र नादुरुस्त झाल्यानंतर ते तातडीने बदलने आवश्यक असते. याबाबत देखील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. जेथे जेथे रोहीत्र नादुरुस्त आहे, तेथे सर्व ठिकाणी असे रोहीत्र तातडीने बदलण्यात यावे. स्थानिक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह घरकुती ग्राहक वीजेबाबत तक्रारी नोंदवित असतात, अशा तक्रारींची तातडीने दखल घेऊन ती निकाली काढली पाहिजे. वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार नाही, याची दक्षता ग्रामपातळीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.
दारव्हा, दिग्रस आणि नेर तालुक्यात चार नवीन विद्युत उपकेंद्र प्रस्तावित आहे. त्यात दारव्हा तालुक्यातील पेकर्डा व साजेगाव, नेर तालुक्यातील नबापूर व दिग्रस तालुक्यातील रामनगर केंद्राचा समावेश आहे. हे चारही केंद्र तातडीने सुरु होण्यासाठी आवश्यक बाबी पुर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.