– ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमे अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानावेळी मंत्री लोढा यांचे प्रतिपादन
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात १ आणि २ ऑक्टोबर २०२३ रोजी गड-किल्ले स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. राज्याचा कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभाग आणि विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील शिवडी किल्ल्यावर करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी किल्ल्यातील परिसराची स्वच्छता केली आणि स्वच्छतेचा संदेश दिला.
यावेळी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा व आमदार कालिदास कोळंबकर, मनपा अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन.,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिंगाबर दळवी उपस्थित होते.
राज्याच्या कौशल्य विभागाकडून ‘स्वच्छता हीच सेवा अभियान’अंतर्गत गड किल्ले स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. यानिमित्ताने १ आणि २ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून राज्यातील किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक ३५० व्या वर्षानिमित्त व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या स्वच्छता मोहिमेत श्रमदान करण्याच्या आवाहनाच्या अनुषंगाने शिवभक्त आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांना ही अनोखी मानवंदना दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाने ‘गड किल्ले स्वच्छता अभियान’ सुरू केले आहे. ज्या अंतर्गत आयटीआयचे दीड लाख विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असलेले ३५० किल्ले स्वच्छ करणार आहेत. हे सर्व किल्ले महाराष्ट्राचे वैभव असून, त्यांचे पावित्र्य जपण्यासाठी मंत्री लोढा यांच्या पुढाकाराने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.शिवडी किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले. त्यानंतर यावेळी कॅबिनेट मंत्री लोढा यांनी आपले मत व्यक्त केले. मंत्री लोढा म्हणाले कि, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शिवरायांना अनोखी मानवंदना देण्यात येत असून, आजच्या या कार्यक्रमात राज्यात ४१८ आय. टी. आय. संस्थांनी परिसर स्वच्छता व ४० आय.टी.आय. संस्थांनी गड किल्ल्यांच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना ऐतिहासिक अशी प्रतापगडाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली, याची नोंद घेतली जाईल.”