![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
– जयहिंदच्या कार्यकर्त्यांनी घेतली आढावा बैठक
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
नागपूर :- सुदृढ समाजनिर्मितीसह सशक्त राष्ट्रनिर्मितीचं ध्येय बाळगून गेली २२ वर्षं अव्याहत काम करणाऱ्या जयहिंद लोकचळवळीने राज्यभरात आपला विस्तार सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून नागपूर जिल्ह्यात जयहिंद लोकचळवळीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. नागपूर जिल्ह्यातून 50 तरुणांनी जयहिंद लोकचळवळीत सामील होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. समाज भवन नागपूर उद्देशीय सहकारी संस्था सुभाष रोड नागपूर येथे झालेल्या बैठकीत लोकांना जयहिंद लोकचळवळीबद्दल मार्गदर्शन केले. या वेळी जयहिंदचे जिल्हा समन्वयक मिलिंद औटी शैलेश कलंत्री, तन्वीर विद्रोही, अनुराग भोयर,विकी बघेल ,रोहित खैरवार,शिवा अर्खेल,अनिकेत समुंद्रे,घनश्याम डकाह,जितू मस्ते,डॉ.ओम् पाटील,अरुण तुर्केल,संतोष मलिक,रोहित समुंद्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.
संगमनेर येथे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या संकल्पनेतून २२ वर्षांपूर्वी जयहिंद लोकचळवळची सुरुवात झाली. आता आमदार सत्यजीत तांबे यांनी या संघटनेची धुरा हाती घेत राज्यभर संघटनेचा विस्तार सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईत झालेल्या जागतिक परिषदेसाठी राज्यभरातून दोन हजारांपेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी निवडक ३०० तरुण-तरुणींना या जागतिक परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती.
आता ज्या तरुणांना जागतिक परिषदेत सहभागी होता आलं नाही, त्यांना जयहिंद लोकचळवळीत सहभागी करून घेण्यासाठी जिल्हास्तरीय आढावा बैठक सुरू झाली आहे. यापैकी नागपूर जिल्ह्यातील बैठक मेहतर समाज कार्यालयात पार पडली. या बैठकीत जयहिंद लोकचळवळीचे जिल्हा समन्वयक मिलिंद औटी, शैलेश कलंत्री यांनी संघटनेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना मार्गदर्शन केलं. संघटनेची उद्दीष्टं, धोरणं, आदींची माहिती त्यांनी या वेळी सर्व नव्या कार्यकर्त्यांना दिली.
शिक्षण, आरोग्य, कृषी, क्रीडा, तंत्रज्ञान, रोजगार निर्मिती, उद्योजकता, जेंडर इक्वॅलिटी, अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या जयहिंद लोकचळवळीचं अंतिम उद्दिष्टं सुदृढ समाजनिर्मितीतून सशक्त राष्ट्र बनवणे, हे आहे. त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी जयहिंदच्या कार्यकर्त्यांना कोणते उपक्रम हाती घ्यावे लागतील आणि काय करावे लागेल, याबाबत या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आता हे कार्यकर्ते नागपूर जिल्ह्यात जयहिंद लोकचळवळीच्या कार्याची धुरा वाहतील.