नागपूर :- गेल्या खरीप हंगामात कापसापासून गाठी तयार करण्यात अपयश आले. त्यानंतरही हार न मानता स्मार्ट प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी प्रयत्नात सातत्य राखले. त्याच्याच परिणामी यंदाच्या हंगामात तब्बल ४९१ गाठी तयार करण्यात यश आले आहे.
राज्यात कापसाच्या मूल्यवर्धनास प्रोत्साहन मिळावे याकरिता बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत स्मार्ट कॉटन योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना कापसावर प्रक्रिया करीत त्यापासून गाठी तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. कापूस गाठी त्यासोबतच सरकीच्या विक्रीतून शेतकऱ्यांना यामध्ये अतिरिक्त पैसा मिळतो. त्यामुळेच कापूस उत्पादकांचे नफ्याचे मार्जीनही वाढते.
या प्रकल्पाचे नागपूर जिल्हा नोडल अधिकारी अरविंद उपरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच क्विंटल कापसापासून एक गाठ तयार होते. त्यानुसार कृषी विभागाकडून पाच तालुक्यांतील ६० गावांमध्ये प्रकल्पांतर्गत सहभागी शेतकरी समूहांना गाठ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले होते. याला शेतकरी समूहांचा देखील प्रतिसाद मिळत यंदाच्या हंगामात तब्बल ४९१ गाठी तयार करण्यात यश आले आहे.
गेल्या हंगामात तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पाला शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या खरिपात उत्पादित कापसापासून एकही गाठ तयार झाली नव्हती. राज्याच्या इतर भागांत मात्र याला व्यापक प्रतिसाद मिळाला असताना नागपूर याला अपवाद ठरले होते. परिणामी, यंदाच्या हंगामात अधिकाऱ्यांनी जागृती करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्याच्याच परिणामी गाठी तयार झाल्या आहेत.
…या तालुक्यांतील शेतकऱ्यांचा सहभाग
सावनेर – नंदापूर
काटोल – झिल्पा
नागपूर – व्याहाड
नरखेड – खरसोली
हिंगणा – मोहगाव
पाच तालुक्यांतील पाच गावांमधील पाच गटांनी या प्रकल्पात सहभाग नोंदविला. सहभागी शेतकऱ्यांची संख्या ९५ असून २४२९.८२ क्विंटल कापूस संकलित करण्यात आला. त्याद्वारे ४९१ गाठी तयार झाल्या आहेत. दोन गाठींना एक खंडी म्हटले जाते. विक्रीच्या वेळी खंडीचा दर ठरतो. तर सरकी २८५० ते २९०० क्विंटलने विकली गेली. परिणामी, शेतकऱ्यांच्या कापसाचे मूल्यवर्धन झाले आहे.
– अरविंद उपरीकर,
नोडल अधिकारी, स्मार्ट कॉटन प्रकल्प, नागपूर