![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
– सीआयआयतर्फे ‘विदर्भ आयटी कॉन्क्लेव्ह’
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
नागपूर :- वेगाने विकसित होणाऱ्या नागपुरात देशातील नामवंत कंपन्या गुंतवणूक करीत आहेत. इतर सर्व उद्योगांसह आयटी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांही नागपूरकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे देशाच्या ह्रदयस्थानी असलेले नागपूर आता उद्योगांसाठी एक आदर्श ठिकाण ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
कॉन्फेडरेशन आफ इंडियन इंडस्ट्रीजच्या (सीआयआय) वतीने मिहान येथे आयआयएमच्या सभागृहात विदर्भ आयटी कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले. यावेळी ना. नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. सीआयआयचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. नंदकुमार, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना.गडकरी म्हणाले, ‘नागपूर हे झिरो माईल आहे. देशातील सर्व प्रमुख शहरांना सारख्या अंतराने जोडले गेलेले शहर आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णत्वास आल्यानंतर आणखी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. नागपुरात आजही आयात-निर्यातीच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. लवकरच नागपूर हे लॉजिस्टिक हब म्हणून नावारुपास येत आहे. अशा परिस्थितीत उद्योगांसाठी नागपूर हे सर्वाधिक आदर्श असे ठिकाण ठरणार आहे.’ नागपूर शहर अनेक बाबतीत देशातील मोठ्या शहरांच्या तुलनेत वेगळे असल्याचेही ते म्हणाले. देशातील अनेक मोठी शहरे आज प्रदूषणाच्या समस्येने त्रस्त आहेत. या शहरांमध्ये वाहतूक कोंडीचाही प्रश्न आहे. नागपूर मात्र सर्व बाबतीत उत्तम आहे. इथे प्रदूषण ही समस्या नाही. एक चांगली स्मार्ट सिटी विकसित होण्याची पूर्ण क्षमता नागपूरमध्ये आहे. चांगली उद्याने, खेळाची मैदाने झाली पाहिजेत. सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावले पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे ना. गडकरी म्हणाले. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगल्या सुविधा, चांगली घरे, सार्वजनिक वाहतुकीची साधने देण्यास नागपूर पूर्णपणे सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले.