नागपूर :- रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी, खड्डेमय रस्त्याची समस्या व नादुरुस्त सिग्नल, पोलिसांचे वाहतुक नियमन सोडून एकाच ठिकाणी झुंडीने फक्त हेल्मेट चालान फाडणे ईत्यादी बाबींवर पोलीस आयुक्तांनी लक्ष देणे गरजेचे असतांना चुकीच्या व सदोष दंड आकारणी केलेल्या वाहन चालकांना न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी संधी न देता वाहने जप्त करण्याचा फतवा काढणे म्हणजे दबंगगिरी असून सामान्य जनतेला न्यायालयीन निर्णया पासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप अखिल भारतीय ग्राहक चेतना मंचाचे केंद्रीय सचिव शरद भांडारकर यांनी केला आहे.
पोलीस आयुक्तांच्या वाहने जप्तीच्या कारवाईने सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागणार असून प्रचंड असंतोष निर्माण होवून पोलीस प्रशासन व वाहन चालकात संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील चौकात वाहतुक नियमन करणे हे वाहतुक पोलिसांचे प्रथम कर्तव्य असतांना सद्यस्थितीत वाहतुक पोलीस फक्त लपून-छपून फक्त हेल्मेट चालान कापण्याचे काम करतांना दिसत आहेत.
या गैरप्रकारांना आळा घालून चौकातील चारही दिशांना वाहतुक पोलिसांनी अपघात मुक्त वाहतुकीचे नियमन करावे, नादुरुस्त सिग्नल दुरुस्त करावे, सुसाट धावणार्या दुचाकी, चारचाकी व ऑटोरिक्शा चालकांना शिस्त लावावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक चेतना मंचाचे केंद्रीय सचिव शरद भांडारकर, नानाभाऊ झोडे, शैलेंद्र दहीकर, अॅड योगेश शुक्ला यांनी केली आहे.
@ फाईल फोटो