यवतमाळ :- मागील दोन तीन वर्षांपासून सोयाबीन पिकावर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या तालुक्यातील काही शेतांमध्ये केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सोयाबीन परेणी झाल्यानंतर उगवण झाली की केसाळ अळीचा (Hairy catterpillar) प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही अळी स्पीलोसामा वर्गातील अळी म्हणून ओळखली जाते. या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्राने केले आहे.
किडीचा जीवनक्रम व नुकसानीचा प्रकार पुढील प्रमाणे आहे, कीड पानाच्या खालच्या बाजुला पुंजक्यांच्या स्वरूपात अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेल्या नवजात अळ्या पिवळसर रंगाच्या असतात. पुर्ण वाढलेल्या अळ्यांच्या अंगावर भरपूर प्रमाणात केस असतात. या अळ्या पानाचा हिरवा भाग खातात. त्यामुळे पाने वाळतात. प्रादुर्भाव जर जास्त झाला तर संपुर्ण पान जाळीदार होऊन फक्त शिरा शिल्लक राहतात. या किडीचा प्रादुर्भाव ओळखून उपाययोजना केल्यास किडीचे व्यवस्थापन प्रभावीपणे होऊ शकते.
किडीच्या व्यवस्थापन उपाययोजना करतांना ज्या शेतात यापुर्वी सुर्यफुल पिक घेतले आहे, त्याठिकाणी सोयाबीन पिक घेणे टाळावे. शेताच्या कडेनी सोयाबीन पेरणीच्या वेळेस सापळा पिक म्हणुन सुर्यफुलाची पेरणी करावी. शेतीचे बांध स्वच्छ ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडीच्या पुरक वनस्पतीचा नाश करावा. अंडी, अळी असलेली पाने काढून नष्ट करावीत. उद्रेकीय भागात प्रकाश सापळ्यांचा वापर करून पतंग नष्ट करावे. शेतात हेक्टरी १५ ते २० पक्षी थांबे लावावेत. प्रतिबंधात्मक उपायाकरीता ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
जैविक किटकनाशक बॅसीलस थुरीनजिंएनसीस व्हेरायटी कुरस्टाकी (सीरोटाइप एव-३९, ३-बी, स्ट्रेन झेड-५२) १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे पिकावर तसेच बांधावर फवारणी करावी. किडीचे रासायनिक नियंत्रण करताना क्विनॉलफॉस २५ इसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्सास क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट १.९ टक्के ईसी किंवा फ्लुबेंन्डामाईड ३९.३५ टक्के एससी ३ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के (उदा. इंडोगोल्ड प्लस, फेगो) ६.७ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
या किडीच्या वाढीसाठी उष्ण तपमान, जास्त आर्द्रता, भारीपाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण पोषक आहे. असे वातावरण आढळल्यास शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबिन पिकाचे नियमित सर्वेक्षण करून सतर्क राहून नियंत्रणाचे उपाय योजावेत, कृषि विज्ञान केंद्राने कळविले आहे.