नागपूर :- कापूस पिकावर मावा, तुडतुडे आणि फुलकिडे ह्या रसशोषक किडीचा तसेच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरुपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो. वरील सर्व प्रकारच्या किडींपासून कपाशी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी सुरुवातीपासूनच या किडींचे व्यवस्थापन केल्यास, हे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. त्यासाठी एकीकृत व्यवस्थापन उपाययोजनाचा अवलंब करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी केले आहे.
एकीकृत व्यवस्थापन
बीटी कपाशीच्या बियाण्याला इमिडाक्लोप्रिड किंवा थायोमिथोक्साम किटकनाशकांची बिज प्रक्रीया केलेली असते. त्यामुळे रस शोसक या किडींपासून सर्वसाधारण २ ते 3 आठवडया पर्यंत संरक्षण मिळते म्हणून या काळात किटकनाशकांची फवारणी करु नये. वेळोवेळी प्रार्दुभावग्रस्त फांदया, पाने, इतर पालापाचोळा जमाकरून किडींसहीत नष्ट कराव्या. पिकामध्ये उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर पिवळे चिकट सापळे लावून नियमित पांढरी माशीच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवावे. कपाशीत चवळीचे आंतर पीक घ्यावे या चवळी पीकावर कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू किटकांचे पोषण होईल. वेळेवर आंतर मशागत करून पीक तणरहित ठेवावे त्यामुळे किर्डीच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल. तसेच बांधावरील किडींच्या पर्यायी खाद्य तणे जसे अंबाडी व रानभेंडी इ. नष्ट करावी. मृद परिक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करावा आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा. जेणेकरून कपाशीची अनावश्यक कायिक वाढ होणार नाही व पीक दाटणार नाही पर्यायाने अशा पिकावर किडही कमी प्रमाणात राहील. रसशोषक किडीवर उपजिवीका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीरफीड माशी, कातीन, ढालकिडे, क्रायसोपा, अॅनॅसयीस प्रजातीचा परोपजीवी किटक संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा. रस शोसक कीडींसाठी कपाशीचे पिकाचे प्रादुर्भाव बाबत सर्वेक्षण करावे. सरासरी संख्या १० मावा/पान किंवा २ ते ३ तूडतूडे/पान किंवा दहा फूलकीड/पान किंवा माव, तुडतुडे आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या दहा/पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाची वापर करावा. त्यासाठी बुप्रोफेजीन २५ टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा फिप्रोनिल ५ टक्के प्रवाही ३० मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के २.५ मि.ली. यापैकी कोणतेही एका किटकनाशकांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसानंतर फेरोमेन सापळयाचा वापर करावा. पिकाच्या वाढीव अवस्थेच्या उंचीनुसार किमान एक फुट अंतर ठेवावे जेणेकरून फेरोमेन सापळ्याचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमेन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळयामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत. प्रत्येक गावात, कापूस संकलन केंद्रे व जीनींग फॅक्टरीमधे १५ ते २० कामगंध सापळे लावून दर आठवडयाने पतंगाचा नायनाट करावा.पिकातील डोमकळया नियमित शोधून त्याअळी सहीत नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढयांची रोकथाम करता येईल. पिक उगवणी नंतर ७५ ते ८० दिवसांनी १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ट्रायकोग्रामाटायोडी बॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मित्र किटकाची १.५ लक्ष अंडी प्रति हेक्टरी चार वेळा सोडावे. गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापन साठी प्रत्येक आठवडयाला एकरी शेताचे प्रतिनीधीत्व करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रार्दुभावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्के पेक्षा जास्त आढळल्यास खाली सांगीतल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ३ मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ टक्के एससी ३० मिली किंवा लॅब्डासायहेलोथ्रीन ५ टक्के ईसी १२ मिली या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.