– विद्युत पुरवठ्याचा प्रश्न गंभीर, पाणीप्रश्नही बिकट
– रस्त्याच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा
यवतमाळ :- शहरात गर्भश्रिमंतांच्या वसाहतीमध्ये विकासकामांचा नेहमी धडाका लावलेला असतो. पक्क्या रस्त्यावरही डांबरीकरण अन् बाजूला गट्टू बसविले जातात. विजेचे खांब, वाहिन्या इतकेच नव्हेतर उच्चदाबाचा विजपुरवठा व्हावा म्हणून नवे रोहित्र बसविले जाते. मात्र, मध्यमवर्गीय, गरीब नागरीकांच्या वसाहतीकडे विकासाच्या बाबतीत आमदारांसह प्रशासन दुजाभाव करते. सध्या पिंपळगाव परिसरातील कमला नेहरु नगरात मुलभूत सुविधांचा अभाव आहे. विजेची कुठलीही सोय नसून पाणीप्रश्न बिकट झाला आहे. रस्त्याचीही दुरवस्था झाल्याने आज शुक्रवारी या भागातील नागरीकांनी एल्गार पुकारत प्रशासनाकडे निवेदन दिले आहे.
राज्य घटनेत समतोल विकासाला महत्व दिले आहे. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समानतेचा पुरस्कार केला आहे. मात्र, आजही गरीब-श्रीमंत हा भेद प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून केला जातो. ज्या भागात गर्भश्रीमंत राहातात, अशा वसाहतीमध्ये विकासकामांचा धडाका लावला जातो. श्रीमंताच्या पायाला माती लागू नये, अशाप्रकारचे रस्ते बनविले जाते. सांडपाण्याच्या व्यवस्थेसह रोडलगत गट्टू बसविले जातात. जागोजागी आमदार-खासदारांकडून बाकडे दिले जातात. मात्र, शहरातील काही गरीब वसाहतीमध्ये कुठलाच विकास दिसत नाही. पिंपळगाव परिसरातील कमला नेहरु नगर परिसरात जवळपास शंभर ते सव्वासे कुटूंब गेल्या 10 ते 15 वर्षापासून वास्तव्याला आहे. मात्र या परिसरात आजही अनेक कुटूंबाकडे विजपुरवठा नाही. या भागात इलेक्ट्रीक पोलची सुध्दा व्यवस्था केलेली नाही. 1985 मधील ले-आऊट असल्याने ले-आऊटच्या मालकाने या भागात त्यावेळी कुठल्याही सुविधांची कामे केली नाही. या नगरात धड चालायला योग्य रस्ते नाही, नळाचे पाणी मिळत नाही, विजेचा प्रश्न गंभीर आहे. विशेष म्हणजे या भागात अनुसूचीत जाती-जमातीच्या कुटूंबांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच कदाचीत विकासकामामध्ये भेद केला जात असावा, असा या भागातील नागरीकांचा आरोप आहे. त्यामुळे आज या भागातील नागरीकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
आमदार महोदय जरा आमच्याकडेही बघा!
यवतमाळ विधानसभेच्या क्षेत्रातीलच आम्ही नागरीक आहोत. मात्र, आमच्या गरीबांच्या वसाहतीकडे लोकप्रतिनिधींचे कधीच लक्ष नसते. स्व-पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले, त्या भागातच विकासकामे वारंवार केली जाते. आज आमच्या वसाहतीपासून 200 ते 300 मिटर दुरवर विजपुरवठा आला आहे. किंमान 10-15 विजेचे खांब उभारल्यास काही कुटूंबांना विजपुरवठा मिळू शकतो. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नाही. आम्ही राहात असलेला भाग हा जंगल परिसर आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांची भिती आहे. विजेचे खांबच नसेल तर दिवे कुठून असेल, असा सवाल कमला नेहरु भागातील नागरीकांनी केला. आमदार साहेब जरा आमच्याकडेही बघा, अशी आर्जव या नागरीकांनी केली.