यवतमाळ :- पशुधन असलेल्या गावांमध्ये जनावरांसाठी उत्तम दर्जाचे वैरण उत्पादन व्हावे यासाठी शासनाच्यावतीने वैरण विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी वैरण विकासाचे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी वणी तालुक्यातील कायर येथे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अँड. निलेश हेलोंडे पाटील यांनी भेट देऊन गायरान क्षेत्रावर कुरण विकास कार्यक्रमाची पाहणी केली.
पाहणी दरम्यान त्यांनी गावकरी तसेच उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना गायरान क्षेत्रावर कुरण विकास कार्यक्रमाचे महत्व समजावून सांगितले. शासनाच्या गायरान जागेवर पशुधनासाठी उत्तम दर्जाचे वैरण उत्पादन करण्यासाठी कुरण विकास करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे, असे संवाद साधतांना ते म्हणाले. मनरेगा, पशुसंवर्धन, कृषि व वनविभागाच्या समन्वयाने कायर येथे गायरान क्षेत्र विकासाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबविला जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
कुरण विकास कार्यक्रम एक अभिनव उपक्रम असून भविष्यात येणाऱ्या चाराटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे, असे यावेळी मिशनचे अध्यक्ष अँड. हेलोंडे यांनी सांगितले. त्यानंतर मिशनच्या अध्यक्षांनी कायर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला देखील भेट दिली. यावेळी सरपंच व सदस्यांनी त्यांचे स्वागत केले व विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी कुरण विकास कार्यक्रमात महत्वाचा सहभाग असणारे कायर या गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तहसीलदार, रोजगार हमी योजनेचे सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, ग्रामसेवक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.