मुंबई/नागपूर :-बुधवारी रात्रीपासून गुरूवारी सकाळपर्यंत बरसलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. नागपूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती उद्भवली. नागपूरलगतच्या बेसा भागात एक युवक नाल्याच्या पुरात वाहून गेला. पावसाळ्यात कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी अशी मागणी आज राज्याचे माजी ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्यचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत केली.
बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातून नदी- नाले दुथडी भरुन वाहत आहेत. शहरातील सडकांना नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र होते. संपूर्ण परिसर जलमय झाले होते. पावसाच्या पाण्यात अनेक अपार्टमेंट बुडाल्याचे पाहायला मिळाले. नरेंद्र नगर पूल, पडोळे चौक, शंकर नगर, मंगलमूर्ती चौकात गुडघाभर पाणी साचले होते. शहरातील पिवळी नदी दुथडीभरून वाहत असल्याने खबरदारी म्हणून योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. रस्त्याचे अक्षरश: तलावात रुपांतर झाल्याने आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्याचे डॉ. राऊत म्हणालेत.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तयारीबाबत आढावा घेऊन शहरातील आणि जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती, धरणातील पाण्याची स्थिती, दरडप्रवण आणि पूरप्रवण परिसराची माहिती घेऊन योग्य नियोजन करावे, नागपूर शहरात व ग्रामीण भागामध्ये धोक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. नागरिकांना आपत्तीच्या वेळी घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती द्यावी. दरडी पडण्याचा धोका असलेल्या भागात पावसावेळी वाहतुकीसाठी रस्ते बंद ठेवावेत. आपत्तीच्या वेळी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक साधने आणि मनुष्यबळाचे नियोजन तयार ठेवावे. विशेषतः पावसाळ्यात कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा तयार ठेवण्याची मागणी यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.