नागपूर : नैसर्गिक आपत्ती काळात व्हॉट्सॲपसह अन्य समाज माध्यमांचा उपयोग करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश आल्याच्या सकारात्मक घटना पाहता सोशल मीडिया हे आपत्तीचा सामना करण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते, असे प्रतिपादन राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त अभय यावलकर यांनी येथे केले.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर जिल्ह्यातील युवक युवतींसाठी आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या चौथ्या बॅचचे उद्घाटन यावलकर यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावलकर म्हणाले, एखादी आपत्ती आल्यानंतर त्याला सर्व प्रथम प्रतिसाद देण्याची जबाबदारी या आपदा मित्रांवर यापुढे राहणार आहे. तेव्हा योग्य वेळी योग्य मदत उपलब्ध झाली तर जीवितहानी सोबतच वित्तीय हानी चे देखील प्रमाण कमी होऊ शकते. त्याकरिता हा शासनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यावलकर हे संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग महाराष्ट्र शासन या पदावर कार्यरत असताना त्या कालावधीत अनेक नैसर्गिक आपत्ती उद्भवल्या होत्या तेव्हा साध्या व्हाट्सअप चा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले होते तेव्हा व्हाट्सअप किंवा सोशल मीडिया हे आपत्तीचा सामना करण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण साधन ठरू शकते.
अभय यावलकर, आयुक्त ,राज्य लोकसेवा हक्क आयोग यांचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी केले. एस डी आर एफ , एन डी आर एफ, रेड क्रॉस सोसायटी ,वैद्यकीय अधिकारी तसेच विविध तज्ञ व्यक्तींना आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन या प्रशिक्षणार्थींना लाभत असल्याचे अंकुश गावंडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. या उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत दुबळे, प्रा. श्याम फाळके, सुशील दुरुगकर, किशोर सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी उदयबीर यांनी केले.
नागपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या नियंत्रणाखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नागपूर जिल्ह्यातील 500 युवक युवतींची निवड करण्यात आलेली आहे.