आता अर्थसंकल्पाचीही ” फाळणी ” करण्याचा काँग्रेसचा इरादा! – कल्याण येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

कल्याण :- धर्माच्या नावाने देशाची फाळणी करणाऱ्या काँग्रेसला आता धर्माच्या नावावर देशाच्या अर्थसंकल्पाचेही विभाजन करावयाचे असून हिंदू आणि मुस्लिमांकरिता स्वतंत्र अर्थसंकल्प लागू करण्याचा काँग्रेसचा विचार आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कल्याण येथे जाहीर प्रचार सभेत केला.

कल्याण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भिवंडी मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत मोदी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी यावेळी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांना अभिवादन करून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाचा प्रारंभ केला.

मोदी म्हणाले की, कल्याणच्या भूमीवर राष्ट्रकल्याणासाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. गरीबांचे कल्याण हे आजच्या राजकारणाच्या कसोटीचे मुख्य केंद्र बनले आहे. देशातील 25 कोटी गरीब पहिल्यांदाच गरीबीतून मुक्त झाले आहेत. गरीबांना प्रथमच मोफत पक्की घरे मिळाली आहेत, पहिल्यांदाच प्रत्येक घऱाला नळाद्वारे पाणी देण्याची मोहीम यशस्वीपणे राबविली जात आहे, प्रत्येक गरीबीकडे आज मोफत आरोग्य सेवेचे गॅरंटी कार्ड आहे, सारा देश हे यश अभिमानाने अनुभवत आहे, असे त्यांनी सांगितले. सरकार बनल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत काय कामे करायची, कोणते निर्णय घ्यायचे, यावर आम्ही सातत्याने काम केले आहे. आज जेवढी मेहनत करत आहोत, तितकीच मेहनत 4 जूननंतरही करत राहू, म्हणूनच, पुढच्या शंभर दिवसांत काय करायचे याची ब्लू प्रिंट तयार करून आम्ही पुढे जात आहोत, असे ते म्हणाले. हा माझ्या आत्मविश्वासाचा मुद्दा नाही, तर जनता जनार्दनाच्या विश्वासाचा आहे.

देशाच्या नवयुवकांकडे कल्पकता आहे, नावीन्यपूर्ण काही करण्याची उमेद आहे, त्यामुळे युवकांनी त्यांच्या कल्पना मला पाठवाव्यात, माझ्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमास पुढे 25 दिवस जोडून मी त्यावर काम करेन, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. देशाचे युवक मला देशाच्या विकासाचे, भविष्याचे नवे विचार देईल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. पुढचे चार महिने असा एक भक्कम पाया तयार करणार आहे, त्याद्वारे 2047 च्या विकसित भारताचे माझे संकल्प अधिक दृढतेने पार पाडता येतील. तुमची स्वप्ने हाच माझा संकल्प आहे, आणि तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्ये क्षण तुमच्या आणि देशासाठी समर्पित असेल, अशी ग्वाहीदेखील मोदी यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की ,आज भारत यशाच्या एका शिखरावर पोहोचला आहे. गेल्या दहा वर्षात देशाच्या प्रत्येक क्षेत्रात नवी उर्जा, नवा विश्वास, नवी गती प्राप्त झाली आहे. ज्यांनी अनेक पिढ्यांना गरीबी हटाओ च्या घोषणा देत स्वप्ने दाखविली, प्रत्येक निवडणुकीत याच स्वप्नाची अफूची गोळी जनतेस दिली, ज्यांनी भ्रष्टाचाराला शिष्टाचार ठरविले, ते लोक देशाचे नेतृत्व करू शकत नाहीत. जनतेची स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत, पुढच्या पिढीचे भविष्य निश्चित करू शकत नाहीत. देशाची ही यशस्वी वाटचाल गती कायम ठएवून देशाची वाटचाल अशीच पुढे नेण्याचे काम आम्हीच करू शकतो. महाराष्ट्रातील मागील सरकारने विकासाच्या सर्व कामांना ब्रेक लावला. आम्ही तो ब्रेक बाजूला केला, आता विकास वेगवान झाला असून रोजगाराच्या संधी वाढतील, नव्या योजना अंमलात येतील. काँग्रेस कधीच विकासाची भाषा बोलत नाही. ते केवळ हिंदू मुस्लीम करत राहतात. केवळ मतपेढीचा विकास हेच काँग्रेसचे धोरण आहे. हिंदू-मुस्लीम करणाऱ्या काँग्रेसला मी सातत्याने उघडे पाडले आहे, असे मोदी म्हणाले. देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे, असे काँग्रेसचे नेते आपल्या सत्ताकाळात उघडपणे सांगत होते. आता देशाच्या अर्थसंकल्पावरही त्यांचा डोळा असून त्यापैकी 15 टक्के निधी मुस्लिमांसाठी देण्याचा त्यांचा विचार आहे. याआधीही त्यांनी हाच प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता, आम्ही त्यास विरोध करून तो हाणून पाडला, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने धर्माच्या आधारावर देशाची फाळणी केली, आता हिंदू आणि मुस्लिमांकरिता स्वतंत्र अर्थसंकल्प आणून धर्माच्या आधारावर अर्थसंकल्पाचीही फाळणी करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असे सांगून, हिंमत असेल तर काँग्रेसने याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही मोदी यांनी दिले.

पहिल्या चार टप्प्यांत महाराष्ट्राने काँग्रेस व इंडी आघाडीला चारीमुंड्या चीत केले आहे. आजही काँग्रेस व इंडी आघाडी तुष्टीकरणाचा खेळ खेळत आहे. एससी, एसटी ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणावर त्यांचा डोळा असून कर्नाटकात ज्याप्रमाणे रातोरात मुस्लिमांना ओबीसी आरक्षण बहाल केले, तीच लूट आता संपूर्ण देशात करण्याचा काँग्रेसचा इरादा आहे, असा आरोपही त्यांनी केला. आता व्होट जिहाद करायला निघालेल्या काँग्रेसला इंडी आघाडीतील एकाही पक्षाने विरोध केला नाही, उलट आम्हीच कर्तव्य म्हणून हा डाव उघड केला आहे. माझ्या प्रतिमेपेक्षा मला माझ्या देशाची एकता महत्वाची आहे, असे सांगून, त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही मोदी यांनी दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

याला जबाबदार OLA की RTO ? 

Thu May 16 , 2024
नागपुर :- इलेक्ट्रिक स्कुटी बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत, मी स्वतः ओला कंपनीची स्कुटी खरेदी केली. अवघ्या सहा महिन्यात स्कुटीची नंबर प्लेट तुटली. मी जेव्हा त्यांच्या नागपुरातील मुख्य सेल अँड सर्विस सेंटरला भेट दिली, तेव्हा अनेक स्कुटीच्या नंबर प्लेट तुटलेल्या आढळल्या. म्हणजे या नंबर प्लेट ॲल्युमिनियम (जर्मन) च्या असल्याने त्या लवकर तुटतात. नंबर प्लेट तुटलेली दिसली की आरटीओ व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com