पुणे :- कृषि विभागातील राजपत्रित अधिकारी गट अ आणि गट ब मधील मंजूर २५८ पदांचा, रिक्त असलेल्या अन्य १ हजार १८ पदांचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत करण्याची मागणी स्पर्धा परीक्षार्थ्यांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास स्पर्धा परीक्षार्थी राज्यव्यापी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
अरविंद कायंदे, संग्राम नरळे, आकाश माने, रोहिणी भाकरे, श्रेया नांगरे, विराज दंडवते, प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषदेत या बाबत माहिती दिली. कृषी विभागात १ हजारपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याकडे दोन-तीन पदांची जबाबदारी आहेत. २०२१च्या २०३ आणि २०२२च्या २१४ जागांसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. कृषि विभागाने २५८ जागांचे मागणीपत्र एमपीएससीला देऊनही एमपीएससीने जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. या २५८ जागांची जाहिरात प्रसिद्ध करून त्यांचा समावेश २५ ऑगस्टला होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत करावा. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल. याबाबत दोनवेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण अद्याप काहीच स्पष्टता नाही, असे कायंदे यांनी सांगितले.
लाडकी बहीण म्हणून आम्हाला सरकारकडून पैसे नकोत. आम्हाला आमच्या पायावर उभे राहायचे आहे. सरकारने कृषि विभागातील हक्काच्या जागा उपलब्ध करून द्याव्यात. तातडीने प्रक्रिया न झाल्यास अनेक उमेदवार वयाधिक होणार आहेत. तसेच अनेक मुलींचे विवाह आणि पुढील आयुष्य थांबले आहे, असे श्रेया नांगरे, रोहिणी भाकरे म्हणाल्या.
दरम्यान, महाराष्ट्र कृषी सेवा गट-अ, गट-ब व गट-ब (कनिष्ठ सेवा) अशी एकूण २५८ पदे सरळसेवा भरतीने भरण्यासाठी कृषि विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्राद्वारे कळवण्यात आले आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी समाजमाध्यमाद्वारे दिली.