नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

· संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

· शेत पीके व पडझड झालेल्या घरांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

अहमदनगर :- पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकतेच वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली‌. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करुन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात आर्थिक मदत वितरित करण्यात येईल.” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला‌. त्यांच्या अडचणी जाणून‌ घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी‌ करण्याचे आदेश दिले. वनकुटे मधील पडझड झालेल्या‌ २२ कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून तत्काळ पक्की घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.

पावसाने वनकुटे गावातील घरांची पडझड झाली आहे ‌. कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.‌ त्यांच्याशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. त्यानंतर शेतकरी बबनराव रामभाऊ काळे, भागा पायगुडे, बबन मुसळे व बाबाजी मुसळे यांच्या शेतीमधील कांदा, मिरची यासह डाळिंब, संत्रा, आंबे, या फळपिकांच्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाणी करून झालेल्या नुकसानाची माहिती जाणून घेतली.

वनकुटे ग्रामदैवत मंदिरात शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. सतत पाच दिवस १० मिलीमीटर पर्यंत पडणारा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून समजण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे‌. नमो शेतकरी सन्मान योजनेत आता शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजारांची मदत देण्यात येत आहे. एक रूपयांत पीक विमा काढण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १० हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यापुढेही मदत देण्यात येईल.

तातडीने पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने करावे. कांदा पिकांची सातबारावर नोंद नसली, तरी पंचनाम्यात नोंद घेऊन नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी प्रशासनास दिल्या.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबातील दोघांना प्रत्येकी १० किलो गहू व तांदळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी वाटप करण्यात आले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांनीही यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते‌.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

16 एप्रिलला महाविकास आघाडीच्या वतीने वज्रमुठ सभा

Tue Apr 11 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठी तालुक्यातून 10 हजार च्या वर नागरिकांचा सहभाग असणार-माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर  कामठी ता प्र 11:- शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ,वाढत्या महागाईसाठी व पोकळ घोषणाबाजी करणाऱ्या सत्ताधारी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने 16 एप्रिल ला नागपूर येथे वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या वज्रमुठ सभेसाठी कामठी तालुका स्तरावर नियोजन बैठक घेण्यात आली यावेळी या वज्रमुठ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!