– येत्या 15 दिवसांत भाजपाचे आणखी 50 लाख सदस्य नोंदविण्याचे लक्ष्य
मुंबई :- संघटन पर्वाअंतर्गत महाराष्ट्र भाजपाने 1 कोटी सदस्य नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. येत्या 15 दिवसांत आणखी 50 लाख सदस्य नोंदवून दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य साध्य केले जाईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला. यासाठी आपण 13 फेब्रुवारीपासून कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत राज्याचा दौरा करणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. 1 कोटींचा टप्पा भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे, जनतेच्या आशीर्वादामुळे गाठू शकलो असेही त्यांनी नमूद केले.
बावनकुळे म्हणाले की, भाजपा सदस्य नोंदणी अभियानामध्ये पंचायत ते पार्लमेंट स्तरावरचे सर्व लोकप्रतिनिधी, बूथ अध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष तसेच पक्ष संघटनेच्या सर्व घटकांनी सहभाग घेतला. आता पुढील 15 दिवस 78 संघटनात्मक जिल्ह्यांमधील 792 मंडलांमध्ये प्रभावीपणे संघटन पर्व राबवण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक वाडी, वस्ती, पाडे, गावांपर्यंत पोहोचून सदस्य नोंदणीला वेग दिला जाईल असेही ते म्हणाले. लवकरच दीड कोटी प्राथमिक सदस्य, 5 लाख सक्रीय सदस्य,1 लाख 186 बूथ अध्यक्ष,1 हजार मंडल यामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होणार आहे असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
बावनकुळे यांनी सांगितले की, प्राथमिक सदस्य नोंदणीबरोबरच 5 लाख सक्रीय सदस्य नोंदविण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले आहे. एका बूथवर 5 सक्रीय सदस्य केले जातील. सक्रीय सदस्य झाल्याशिवाय कोणत्याही शासकीय महामंडळावर, जिल्हा, तालुका स्तरीय शासकीय समितीवर नियुक्ती होणार नाही. बूथ अध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष अशा सर्वांना सक्रीय सदस्य व्हावे लागणार आहे. डबल इंजिन सरकारमुळेच विकसित महाराष्ट्र होईल हा विश्वास राज्यातील जनतेच्या मनात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर, विचारांवर जनतेला विश्वास असल्याने इतक्या मोठ्या संख्येने नागरिक भाजपाचे सदस्य होण्यास उत्सूक आहेत असे श्री. बावनकुळे म्हणाले. जनतेचा भाजपावर असलेला हा विश्वास सार्थ करण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी अखंड कार्यरत रहायला हवे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला
एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्काराने सन्मान म्हणजे उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी उत्कृष्ट काम केले याचे पवारांनी दिलेले प्रमाणपत्रच आहे, असे म्हणत श्री. बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मुख्यमंत्री असताना मंत्रालयात केवळ दोन दिवस जाणारे उद्धव ठाकरे आणि 22 – 22 तास मुख्यमंत्री म्हणून प्रभावी कामगीरी करणारे एकनाथ शिंदे यांच्या कार्यातील जमीन अस्मानाचा फरक पवारांना उशिरा का होईना कळला. पवारांनी एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक संदेश असून त्यातून उद्धव ठाकरे यांनी बोध घ्यावा अशी खोचक टिप्पणी बावनकुळे यांनी केली.