– यंग इंडिया बिझनेस क्लब नागपूर चॅप्टरचे उद्घाटन
नागपूर :- विदर्भातील पर्यटन, उद्योग विकसित होत आहेत. उद्योग आणि कृषी क्षेत्रातील गुंतवणुक वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विदर्भाला समृद्ध करण्याचे उद्दिष्ट आम्ही डोळ्यापुढे ठेवले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये यंग इंडिया बिझनेस क्लब नागपूर चॅप्टरचे उद्घाटन ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योजक नितीन खारा, रमाकांत खेतान, सनी अग्रवाल, देवेंद्र अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. गडकरी म्हणाले, ‘गरिबी दूर करणारी अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल तर त्यासाठी रोजगार निर्मिती करावी लागेल. आणि रोजगार निर्मितीसाठी उद्योग विकसित करावे लागतील. त्यामुळे यंग इंडिया बिझनेस क्लबला उद्यमशिलता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. त्याचवेळी भविष्याचा वेध घेणाऱ्या तंत्रज्ञानाचाही अभ्यास करावा लागेल. विदर्भात जोपर्यंत ५०० कोटींच्या वर गुंतवणुक करणारे ५० लोक आणि एक हजार कोटींच्या वर गुंतवणुक करणारे १० लोक उभे होत नाहीत तोपर्यंत विदर्भाचा विकास दर वाढणार नाही. पुढील ५० वर्षांचा विचार करून काम केले तरच विदर्भाचा विकास दर वाढविता येणार आहे.’
‘आपल्या देशात प्रगती करायची असेल, विकास करायचा असेल तर विकास दर वाढवावा लागेल. त्यासाठी उद्योग, कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवावे लागेल. प्रक्रिया उद्योग सुरू करावे लागतील. निर्यात वाढवावी लागेल आणि आयात कमी करावी लागेल,’ असेही ना.गडकरी म्हणाले.