कोदामेंढी :- येथील वार्ड क्रमांक एक मधील भोजराज बावनकुळे ते केशव बावनकुळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम मागील तीन महिन्यापूर्वी सुरू झाले होते. रस्ता खोदून त्यात गिट्टी (बोल्डर) पसरवण्यात आलेले आहे. मात्र रोलर (बेलन) साठी हे काम मागील तीन महिन्यापासून बंद असल्याचे वार्ड क्रमांक एकचे सामाजिक कार्यकर्ते नामदेव हटवार यांनी भ्रमणध्वनी वरून सांगितले. त्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा राहणारे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील वार्ड क्रमांक एक मधील भोजराज बावनकुळे ते केशव बावनकुळे यांच्या घरादरम्यान तीन महिन्यापूर्वी सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी रस्ता खोदण्यात आला व त्यात गिट्टी (बोल्डर) टाकण्यात आले. तर रस्त्याच्या मधोमध गिट्टी ठेवण्यात आली आहे . तेव्हापासून काम बंद असल्याचे रस्ता दुतर्फा राहणारे नागरिक येथील तेली समाजाचे अध्यक्ष केशव बावनकुळे, पूर्णा ओमकार वाघमारे सह अनेक महिला व पुरुषांनी सांगितले. याबाबत वार्ड क्रमांक एकचे ग्रामपंचायत सदस्य रवी ठवकर यांना आज भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ,त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याच वार्डाच्या ग्रामपंचायत सदस्या अनिता नामदेव हटवार यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्या कामावर गेल्याचे त्यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते नामदेव हटवार यांनी सांगितले व या रस्त्यावर रोलर (बेलन) जात नसल्याने व रस्त्याच्या अंदाजपत्रकानुसार रस्ता टिकाऊ व मजबूत बनण्यासाठी बोल्डरवर मुरूम व पाणी टाकून रोलरने मळणी करून रस्त्याचे मजबूतीनकरण करावे लागते त्यामुळे हे काम तीन महिन्यापासून ग्रामपंचायत प्रशासनाने थांबविल्याचे हटवार सांगितले.
ग्रामपंचायत प्रशासनाने नव्हे तर येथील वार्ड क्रमांक चार चे इमानदार ग्रामपंचायत सदस्य खुशाल शिवणकर यांनी हे काम अडविल्याचे वार्ड क्रमांक एकचे रहिवासी तेली समाजाचे अध्यक्ष केशव बावनकुळे यांनी सांगितले. वार्ड क्रमांक एक मध्ये अडचणीची जागा असल्याने रोलर ऐवजी धुम्मस करून रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येऊ शकते परंतु रोलरसाठी नव्हे तर रुपयांसाठी(कमिशनसाठी) शिवणकर यांनी रस्त्याचे काम बंद पाडल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. त्यांच्या खिशात नोटांचा बंडल जाताच मग ते कामाच्या दर्जाबाबत काहीच बोलत नाही ,असेही बावनकुळे यांनी सांगितले
ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला अमाप खर्च काढण्यासाठी ते ग्रामपंचायतच्या प्रत्येक कामात दहा टक्के कमिशन मागत असल्याची संपूर्ण गावात चर्चा आहे. मात्र त्यांच्या कमिशनच्या मागणीपोटी बांधकामांना अत्यंत उशीर होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त आहे.