संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– रमाई नगरातील पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी
कामठी :- राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती ला सामाजिक न्याय दिनी 26 जुन रोजी प्रभाग 15 च्या माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी त्यांच्या सात समर्थका सह नगर परिषद प्रशासना विरोधात आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे.याबाबतचे निवेदन शुक्रवारी निवासी जिल्हाधिकारी अनुप खांडे यांना दिले.
रमाई नगरात गत 10 वर्षा पासुन जवळपास 60/70 घरांना पाणी पुरवठा होत नाही.तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत पाईपलाईन मंजूर करण्यात आली त्या बाबतची फाइल न प पाणी पुरवठा विभागात कपाटबंद आहे. स्थानिक नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षा मुळे रमाई नगरातील नागरिक आजही पाणी टंचाई ला तोंड देत आहेत.लोकसभा निवडणुकी पुर्वी स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन, तक्रार, विनंती अर्ज माजी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या नेतृत्वात प्रशासक संदीप बोरकर यांना देण्यात आले, थाळी नाद आणि माठ फोड़ो आंदोलन देखील करण्यात आले.पण मुक्या, बहिऱ्या आणि आंधळ्या प्रशासनाला जाग आली नाही.
लोकसभा निवडणुकी दरम्यान रमाई नगरातील नागरिकांनी मतदाना वर बहिष्कार टाकण्याचे निवेदन सहायक निवडणुक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांना दिला होता,या वेळी भाजपा प्रदेशा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्ती मुळे मतदाना वरिल बहिष्कार मागे घेतला. मतदाना नंतर 2 पाईपलाईन ची मागणी असतांना एकच पाईपलाईन टाकण्यात आली,एप्रिल महिन्यात टाकलेली पाईपलाईन अद्यापही मेन पाईपलाईन ला जोड़ण्यात आली नाही त्यामुळे आजही या भागात पाणी पूरवठा बंद आहे, त्या मुळे महिलाना पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे.
नगर परिषद प्रशासना च्या हेकेखोरपणा मुळेच रमाई नगरातील नागरिकांना पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे,त्या मुळे सात समर्थकांसह आत्मदहनाचा निर्णय घेतला असल्याचे माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी सांगितले, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, भाजपा प्रदेशाध्यक्ष, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, उपविभागीय अधिकारी यांना शुक्रवारी देण्यात आले.