Ø दारव्हा शहर पाणीपुरवठा योजनेचा आढावा
Ø अतिरिक्त कामांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
यवतमाळ :- दारव्हा शहर पाणी पुरवठा योजनेचा पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आढावा घेतला. येत्या 15 दिवसात शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करा, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. योजना पुर्ण होण्यासाठी होत असलेल्या विलंबाबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
बैठकीला पालकमंत्र्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता गव्हाणकर, कार्यकारी अभियंता व्यवहारे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शिंदे कार्यकारी अभियंता खंगार, दारव्हाचे उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्यासह पाणी पुरवठा योजनेचे काम करणारे सल्लागार, कंत्राटदार उपस्थित होते.
दारव्हा शहरातील ही योजना 2016 मध्ये मंजूर झाली. जास्तीत जास्त दोन वर्षात काम पुर्ण होणे अपेक्षित होते. परंतू कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अद्याप योजना सुरु झाली नाही. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यासोबत नवीन कंत्राटदार नेमून उर्वरीत कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. उर्वरीत कामांसोबतच येत्या 15 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
यावेळी पालकमंत्र्यांनी जलकुंभ, वितरण व्यवस्था, पाणी शुध्दीकरण यंत्रणा, वितरण व्यवस्थेची टेस्टींग, शुद्धीकरण केंद्रातील विद्युत व्यवस्थेची टेस्टींग, योजनेला पर्यायी वीज पुरवठा, पोहोच मार्ग, लिकेजेसची दुरुस्ती, पंप हाऊस बांधकाम, क्लोरिनेशन युनीट यासह योजनेच्या उर्वरीत कामांचा काम व विभाग निहाय आढावा घेतला. जीवन प्राधिकरणकडे प्रलंबित कामे, वीज वितरण कंपनीकडे प्रलंबित कामे व नगरपरिषदेने करावयाच्या कामांचा बाबनिहाय आढावा घेतला.
प्रलंबित कामे संबंधित विभागाने कालमर्यादेत पुर्ण करण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली. या मर्यादेत कामे न झाल्यास कंत्रादारांसह संबंधित विभागाचे अधिकारी देखील तितकेच जबाबदार राहतील, असे पालकमंत्री म्हणाले. जुन्या कंत्राटदाराने केलेल्या कामाची मोजणी करावी. त्यानंतर योजनेच्या शिल्लक व अतिरिक्त कामांची लागणाऱ्या आवश्यक निधीचा प्रस्ताव सोमवारी स्वहस्ते मंत्रालयात पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.