संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सर्वत्र हिट अँड रण चा विषय गाजत असला तरी येथील वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षितेमुळे कामठी तालुक्यात अल्पवयीन व अप्रशिक्षित वाहनचालकांची संख्या रोडावली आहे.
वाहनचालकाकडे वाहन चालविण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसताना ,वाहतुकीचे कोणतेही नियम माहीत नसताना कामठी तालुक्यात अल्पवयीन वाहनचालक रस्त्यावर बिनधास्तपणे वाहन चालवीत आहेत.यामुळे यांच्यासह इतरांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.सध्या अपघाताचे प्रमाण वाढले असले तरी अल्पवयीन मुलांचे पालक आपल्या मुलाला सर्रासपणे वाहने वापरायला देत आहेत.कामठी तालुक्यातील कित्येक वाहने कालबाह्य झाली आहेत तरी ते रस्त्यावर धावताना दिसत आहेत. कर्णकर्कश हॉर्न व आवाज करणाऱ्या वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. वाहनात फेरबदल करून मोठा आवाज देणारे सायलंसर लावणे, वाहनांचे सायलंसर काढून वाहन चालविणे,परिणामी कर्णकर्कश आवाजाने नागरिक हैराण झाले आहेत.अशा वाहनावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अल्पवयीन वाहन चालविण्यावरील कारवाई ही अपघात कमी करण्याचा व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे.तेव्हा पोलिसांनी याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
– अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन दिल्यास दंड
– मोटर वाहन कायद्याच्या नवीन कलम 199(ए)अंतर्गत वाहनाचा मालक जवाबदार असेल आणि अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविल्यास त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा 25 हजार रुपये दंड होऊ शकतो.