– शेतकऱ्यांना दिला मार्गदर्शनपर सल्ला
रामटेक :- येत्या खरीप हंगामात रामटेक उपविभागात येत असलेल्या रामटेक तालुक्यात सोयाबीन पिक प्रमुख पिकांपैकी एक आहे. तथापि तालुक्यात सोयाबीन पिकाची उत्पादकता कमी होत असल्याचे आढळून येत आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच अवलंब न करणे,नवीन उन्नत जाती न वापरणे,एकरी झाडांची संख्या न राखणे,बीजप्रक्रिया न करणे, उगवण तपासणी न करणे,शिफारसीत खत मात्रेचा वापर न करणे, तन व किडीचा वेळेत बंदोबस्त न करणे, बिबिएफ तसेच सरी वरंबा व पट्टा पद्धतीचा वापर न करणे ईत्यादि कारणे त्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे.हि बाब लक्ष्यात घेऊन सोयाबीन च्या उत्पादन वाढीसाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवानी सोयाबीन अष्ठसूत्रीचा वापर करणे आवश्यक असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी अमरज्योती गच्छे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर सल्ला देत सांगीतले आहे.
सोयाबीन अष्ठसूत्री बाबद माहिती देतांना उपविभागीय कृषी अधिकारी अमरज्योती गच्छे यांना सांगीतले की, सोयाबीन पिकाचे घरचे बियाणे वापरात असाल तर ७० % किंवा त्यापेक्षा जास्त उगवण क्षमता असलेल्या बियाण्याचीच पेरणी करिता निवड करावी. घरगुती पद्धतीने बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करावी. बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. रामटेक तालुक्यात सोयाबीन पिकात खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव खूप आढळून येते त्यामुळे बियाण्यास थायोमिथाक्झाम ३० एफ.एस ६ मिली प्रति किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी कार्बोक्झीन ३७.५ % ३ ग्राम + थायरम ३ ग्राम प्रति किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.तसेच रायझोबियम + पीएसबी + केएमबी २५ ग्राम किंवा द्रवस्वरुपात असल्यास ६ मिली प्रति किलो बियाण्यास चोळावे व नंतर २ तास सावलीत सुकवून पेरणी करावी. महत्वाचे म्हणजे बीजप्रक्रिया करतांना एफ(बुरशीनाशक). आई(किटकनाशक). आर(रायझोबियम) या पद्धतीने करावी. सुधारित प्रचलित प्रामुख्याने १० वर्ष्याचा आतील प्रसारित रोग व किडीस प्रतिकारक वाणांची निवड करावी. सलग दोन ते तीन दिवसात ७५ ते १०० मिमी पाउस अथवा ४ ते ६ इंच जमिनीत ओल उपलब्ध झाल्यानंतर व वापसा आल्या नंतरच पेरणी करावी.पेरणी करत असतांना बियाणे ३ ते ५ सेमी खोलीवर पडत असल्याची खात्री करावी. बिबिएफ पद्धतीने,सरी वरंबा पद्धतीने किंवा पट्टा पद्धतीने (४ किंवा ६ ओळीनंतर २ फुटाचा पट्टा सोडून) सोयाबीन पिकाची पेरणी करावी.बिबिएफ पद्धतीने पेरणी केल्यास २२ किलो,सामान्य पद्धतीने पेरणी केल्यास २६ ते ३० किलो बियाणे प्रति एकर वापरावे. त्याचप्रमाणे योग्य रासायनिक खतमात्रेचा वापर करावा.सोयाबीन पिकास पं.दे.कृ.वि.अकोला विद्यापीठाच्या शिफारसी प्रमाणे एकरी १२ किलो नत्र,३० किलो स्पुरद व १२ किलो पालाश या प्रमाणे खते द्यावीत. तन व्यवस्थापनाकरिता योग्य उगवणपूर्व व उगवण पश्यात शिफारसीत प्रमाणात वापर करावा.कीड व रोग व्यवस्थापनाकरिता नियमित पिकाचे निरीक्षण करावे व त्याप्रमाणे फवारणी करावी.खोडमाशी प्रादुर्भावाचे निरीक्षण घेनेकरिता शेतातील काही प्रातिनिधिक झाडे उपटून त्यांचे खोड चिरून बघावे. तेव्हा आता यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात सोयाबीन उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी या अष्ठसूत्रीचा नक्कीच अंगीकार करावा असे आवाहन डॉ.ए.टी.गच्चे उपविभागीय कृषि अधिकारी, रामटेक यांनी केलेले आहे.