-यूके, यूएसए, जर्मनी, ऑस्ट्रेलियात शिक्षण
-प्रति विद्यार्थी 40 ते 50 लाखांचा खर्च
नागपूर :- सामान्यांकडे आशा आणि इच्छा असतात तर यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना. स्वप्न तर प्रत्येकाकडे असतातच. पण निव्वळ स्वप्न राहून उपयोग नाही. ती सत्यात उतरविण्यासाठी कठोर परिश्रमाचीच नव्हे तर कृतीचीही गरज असते. नागपूर विभागातील अशाच 53 विद्यार्थ्यांनी त्याग आणि कठोर परिश्रमासह सकारात्मक कृती केली. परदेशात जाऊन शिक्षण घेतले. विशेष म्हणजे यासाठी राज्य शासनाची मोलाची साथ लाभली. समाज कल्याण विभागाने त्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली अन् त्या संधीचे त्यांनी सोने केले.
समाज कल्याण विभागातर्फे गरीब, गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीसाठी 40, तर ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटीसाठी 13 जागा आहेत. नागपूर विभागातून दर वर्षाला 53 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. 2022 या वर्षात नागपूर जिल्ह्यातील 33, चंद्रपूर-3 आणि वर्धा जिल्ह्यातील एक, तर ओबीसी, एसबीसी नागपूर – 10, वर्धा-2 आणि भंडारा – 1 अशा एकूण 13 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र, आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. समाज कल्याण विभागाच्या योजनेप्रमाणे विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांना शासनाच्या खर्चाने परदेशात शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यात यूके, यूएसए, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आदी देशांत शिक्षण दिले. 2022 या वर्षात 80 टक्के विद्यार्थी अभियंता आणि व्यवस्थापक झाले. प्रति विद्यार्थी 40 ते 50 लाखांचा खर्च शासनाने उचलला आहे.
…चौकट…
विद्यार्थ्यांचा त्याग आणि परिश्रम
लिफ्ट म्हणजे नशीब अन् पायर्या म्हणजे कष्ट. लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण पायर्या नेहमी शिखरावर घेऊन जातात. यशाची दारे नेहमीच उघडी असतात मात्र ती उघडून पुढे जाण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. योजनेतील यशस्वी 53 विद्यार्थ्यांनी त्याग केला आणि परिश्रम घेतले. त्या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन समाज कल्याण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांनी केले.