– महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
यवतमाळ :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. काही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले नसल्याने ते लाभापासून वंचित होते. शासनाने अशा शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिम राबविली. मोहिमे दरम्यान मागिल महिन्यात प्रमाणिकरण झालेल्या जिल्ह्यातील 829 शेतकऱ्यांच्या खात्यात 3 कोटी 52 लाखाची प्रोत्साहन रक्कम जमा करण्यात आली आहे.
कर्जमुक्ती योजनेमध्ये सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षामध्ये कोणत्याही दोन वर्षात बँकेकडून पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेली आहे, असे शेतकरी प्रोत्साहन लाभासाठी पात्र ठरविण्यात आले होते. प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र असलेल्या राज्यातील ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले नसल्याचे त्यांना ५० हजार प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नव्हता. या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणाची संधी देण्यात आली होती.
त्यानुसार आधार प्रमाणिकरण केलेल्या राज्यातील ११ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या खात्यात ४६ कोटी ७० लाखाची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम दिनांक 1 ऑक्टोबर रोजी वर्ग करण्यात आली आहे. जे शेतकरी आधार प्रमाणिकरण करण्यापूर्वी मयत झाले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या वारसांची नावे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेनंतर लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत १४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना ५ हजार ३१० कोटी रक्कमेचा प्रोत्साहनाचा लाभ देण्यात आला आहे, असे सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांनी कळविले आहे.