सोयाबीनच्या नुकसानीपोटी विम्याची २५ टक्के रक्कम आगाऊ मिळणार – पालकमंत्री संजय राठोड यांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना

यवतमाळ :- जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीपोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, याबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनास सूचना दिल्या होत्या. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून नुकसानग्रस्तांना पीक विम्याच्या २५ टक्के रक्कम येत्या महिनाभरात देण्याचे आदेश रिलायंस जनरल इंन्शुरन्स कंपनीला दिले आहे.

सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. संयुक्त पाहणी अहवालानुसार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ११० महसूल मंडळामध्ये सोयाबीनचे उत्पादन हे मागील सात वर्षांच्या सरासरीच्या ५० टक्के कमी होणार असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. याची दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याबाबत विमा कंपनीस निर्देश देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या होत्या.

केंद्र शासनाच्या १७ ऑगस्ट २०२० च्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखीमेच्या बाबी अंतर्गत अधिसूचित विमा क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी संभाव्य नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्के आगावू रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्याची तरतूद आहे. याबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत चर्चेअंती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्वेक्षण अहवालानुसार जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी अधिसूचित मंडळातील सोयाबीन पिकासाठी संभाव्य नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीला दि.३० सप्टेंबर रोजी आदेश दिले. त्यानुसार अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे. ही अधिसूचना जाहीर केल्यापासून पीक विम्यासाठी पात्र ठरलेल्या विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत नुकसानभरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीस देण्यात आले आहेत.

पीक विमा रकमेच्या २५ टक्के रक्कम अदा केल्यानंतर हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणाऱ्या नुकसानभरपाईसाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी पात्र राहतील. नुकसानभरपाईपोटी देण्यात आलेली आगाऊ २५ टक्के रक्कम अंतिम येणाऱ्या नुकसानभरपाईतून समायोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत 14 हजार 841 शेतक-यांना लाभ

Fri Oct 4 , 2024
गडचिरोली :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यापावेतो आपले आधार प्रमाणीकरण केले अशा 14 हजार 841 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 47 कोटी 30 लाख रुपये रक्कम शासनाने जमा केलेले असुन, यामध्ये गत ऑक्टोबर महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील 123 शेतकऱ्यांच्या खात्यात 48.00 लाख रूपये जमा करण्यात आले. या प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील 112 शेतकऱ्यांनी अद्याप आपले आधार प्रमाणिकरण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!