संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
शासनाची ‘सन 2022’पर्यंत सर्वांसाठी घरे संकल्पना धुळीस
-मागील पाच वर्षात फक्त 276 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ
-प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शहरवासीयांचे घरकुल योजनेचे स्वप्न भंगले
कामठी ता प्र 15 :- ‘रोटी कपडा और मकान’या त्रिसूत्री कार्यक्रमातील अत्यंत महत्वाचा समजल्या जाणारा भाग म्हणजे निवारा. तेव्हा बेघर असलेल्या नागरिकांसाठी कामठी नगर परिषद च्या वतीने शासकीय योजनेच्या माध्यमातून इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना तसेच शबरी योजनेच्या लाभातून योग्य त्या लाभार्थ्यांना निवासाची सोय करून दिली त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षांपूर्तीनिमित्त सन 2022 पर्यंत सर्वांना घरे या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना 2015 मध्ये सुरू केल्यानुसार कामठी नगर परिषद च्या वतीने 10 एप्रिल 2017 पासून पंतप्रधान आवास योजना राबविण्यास सुरुवात केली.या योजनेअंतर्गत 5 हजार घरकुलांचे उद्दिष्ट असून 6 हजार 100लाभार्थ्यांनी अर्ज घेतले होते मात्र आज पाच वर्षे लोटूनही बोटावर मोजण्याइतक्या लाभ देऊन बहुतांश संख्येत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना अजूनपावेतो लाभ मिळू शकला नसल्याने शासनाने कार्यान्वित केलेली’ सन 2022 सर्वांसाठी घरे’ही संकल्पना धुळीस मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कामठी नगर परिषद ला घरकुल लाभासाठी अर्जाची केलेल्या छाननी नुसार भाडेकरू, नझुल व आखिवपत्रिका धारक अश्या तीन घटकांचे डीपीआर तयार करून 1077 अर्ज मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते ज्यामध्ये 688 नझुल धारक, 200 अखिवपत्रिका धारक व 189 पट्टेधारक लाभार्थ्यांचा समावेश आहे .यातील 688 नझुल धारक लाभार्थ्यापैकी फक्त 116 लाभार्थ्यांनी योग्य त्या कागदपत्रांची जुळवाजुळव केल्याने या योजनेचा लाभ घेण्यात यशस्वी ठरले तर यातील 572 लाभार्थी आखीवपत्रिका व स्थायी पट्ट्याच्या अडचणीत अडकल्याने घरकुल लाभापासून अजूनही वंचित आहेत तर 200 आखिवपत्रिका लाभधारक पैकी 160 घरकुल धारकांचे कामे प्रगती पथावर आहेत तर 40 लाभार्थ्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव न केल्याने 40 लाभार्थ्यांनी कामाचा शुभारंभच केला नसल्याचे दिसून येते तर आखीवपत्रिकाधारक असलेल्या 189 लाभार्थ्यांचा डीपीआर ची मंजुरी घेऊन लवकरच लाभ देण्यात येईल .एकंदरीत या पाच वर्षात एकूण 1077 लाभार्थ्यापैकी फक्त 276 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून 801 लाभार्थी घरकुल लाभापासून अजूनही वंचित आहेत. ज्यामुळे कामठीत पंतप्रधान आवास योजनेचे तीनतेरा वाजत आहेत.त्यामुळे शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सन 2022 सर्वांसाठी घरे’ ही संकल्पना मुळातच नगर परिषद चा चालढकलपना मुळे धुळीस मिळत आहे.
केंद्रात व राज्यात भाजप ची सत्ता असुन मागील 15 वर्षांपासून भाजप चेच आमदार म्हणून तसेच माजी पालकमंत्री म्हणून पद भूषविनारे आमदार चंद्रशेखर बावनकुळे या कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत .कामठी शहर हे अजूनही अविकसित असून येथे मोठ्या प्रमाणात दारिद्र्यरेषेखालील कुटुंब मोठ्या प्रमाणात आहेत तसेच मागासवर्गीय, निरक्षर, निराधार या कुटुंबियांना अजूनही पक्का निवारा नाही कित्येक अनियमित झोपडपट्टीत जीवन वास्तव्य करीत आहेत तसेच एक पिढी लोटूनही या झोपडपट्टीत राहनाऱ्या आम आदमीच्या वाट्याला अजूनही उपेक्षाच राहिल्याने कित्येक झोपडपट्ट्या ह्या नियमित होण्याच्या प्रतीक्षेत असून तळहातावरचे जिणं जगत आहेत.तेव्हा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर व 24 तास पाण्याची सोय मिळणार या हेतूने कित्येक लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत घरकुल साठी अर्ज केले मात्र आज पाच वर्षे लोटूनही योजनेचा लाभ मिळू शकला नाही ही एक शोकांतिकाच मानावी लागेल.
नागपूर पासून हाकेच्या अंतरावर असलेले कामठी शहर हे 1 ते 11 शीट मध्ये वसलेले असून 1127 घरधारकाना पट्टे वितरण करण्यात आले आहेत ज्यामध्ये 258 पट्टे धारकांचे नुत्नीकरणाची मुदत ही 2020 पर्यंत होती तर 869 पट्टेधारकांनी मुदत संपूनही नूतनीकरण केलेले नाही तसेच काही भाग खाजगी व नझुल मध्ये बसलेले आहे.तत्कालीन राज्य शासनाच्या 4 एप्रिल 2002 च्या शास्कोय परिपत्रकानुसार तत्कालीन शासनाने 2000 पर्यंतच्या सर्व झोपडपट्ट्या अधिकृत करण्याचे ठरविले होते तसेच 1995 पूर्वीच्या झोपडपट्ट्या नियमित करण्यासाठी प्रशासनाची मौन भूमिका असल्यांने शहरातोल रामगढ, आनंदनगर, सैलाबनगर,वारीसपुरा, आझादनगर, कामगार नगर यासारख्या कित्येक झोपडपट्ट्याना नियमित करण्यात आले नसून या झोपडपट्टीतिल घरधारकानी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ होणार या अपेक्षेने पंतप्रधान आवास योजनेचे ऑनलाईन अर्ज करून घरकुल ची अपेक्षा केली असली तरीही अपेक्षाभंग होत असून घरकुलाचे स्वप्न भंगत आहे.
-पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी 688 मंजूर नझुलधारक लाभार्थ्यांपैकी 116 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला असला तरी उर्वरित 572 लाभार्थ्याना नेमून दिलेल्या एजेंसी च्या वतीने केलेल्या सर्वेक्षणातून लवकरच स्थायी पट्टा देऊन घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते तसेच 189 आखिवपत्रिका धारक लाभार्थ्यांना मंजुरी देऊन घरकुल चा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगितले.