नागपूर :- महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने सुरु झालेली महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ही आशु नेवारे सारख्या गरीब व होतकरु मुलींसाठी वरदान ठरली आहे. पदवी शिक्षण घेणाऱ्या आशु नेवारेला या योजनेच्या आर्थिक लाभाने नवी उमेद मिळाली आहे. रामटेक तालुक्यातील पवनी येथील आशु नेवारे हिला स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करीत असताना या योजनेच्या आर्थिक लाभाने बळ मिळाले.
घेतलेल्या शिक्षणाचे भविष्यामध्ये फळ मिळावे यासाठी सातत्याने अभ्यासाची दिनचर्या बाळगणाऱ्या आशुला अभ्यासपूरक आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरिता या योजनेचा लाभ झाला. थोडी मरगळ दूर होऊन उंच भरारी घेण्याचा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे त्या सांगतात. भविष्यात काही ठोस करुन दाखविण्यासाठी आशु सारख्या असंख्य मुली महाराष्ट्रात सज्ज झाल्या आहेत.