ठाणे :- प्रत्येक विद्यार्थ्यांची आवड निवड ही वेगवेगळी असते. त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
आर्य समाज, वाशी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी राजस्थानमधील खासदार स्वामी सुमेधानंद सरस्वती, विवेकानंद परिव्रजक, राजकुमार दिवाण, धर्मवीर शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हिंदी विषयामध्ये प्राविण्य मिळविलेल्या नेरुळ येथील डी. ए. व्ही. पब्लिक स्कूलचे विद्यार्थी नमन ठाकूर, कुमार दिव्यम झा, वंशिका चंद, सान्वी शरण, तसेच वाशीच्या फादर अग्नेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी सिध्देश रुपेश काळे, वाणी कौर चोप्रा, वाशी इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी आर्यन कृष्णप्रसाद, एपीजे स्कूल नेरुळच्या संहिता रंगराजन, एपीजे स्कूल नेरुळचा विद्यार्थी अनंतजीत पांडे, डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल, पनवेलची विद्यार्थीनी ईशा जाधव यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, आपण सर्वांनी शिक्षित होऊन सुसंस्कृत होणे गरजेचे आहे. आपण कितीही मोठे झालो तरी आपले लक्ष भारतमातेकडे असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सर्वांना हिंदी भाषा समजते. हिंदी भाषेचा कोणताही प्रचार न करता विस्तार होत आहे. ही भाषा सर्वांना जोडण्याचे काम करते. त्याबरोबरच आपण राहत असलेल्या महाराष्ट्रातील मराठी भाषा शिकणे गरजेचे आहे, असेही भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.