कोदामेंढी :- येथील सावंगी रोडवरील, स्मशान घाटापर्यंतच्या चार पथदिव्यावरील पथदिवे उन्हाळ्यापासून बंद असून त्या पोलांवर व तारांवर काटेरी झाड लोम्बकळत असून झाडांची छटाई करून पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सावंगी रोडवरील सुर नदीवरील पुलिया झाल्यामुळे या रस्त्यावरील वर्दळ वाढलेली आहे, मात्र कोदामेंढी ते सावंगी या रोडावर रात्रीला पथदिवे बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य असते, त्यामुळे येथे पथदिवे लावण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली.
याबाबत येथील दिवाबत्ती कर्मचारी नथू सोनटक्के यांना भ्रमणध्वनी वरून विचारपूस केली असता येथील सरपंच आशिष बावनकुळे हे काम संबंधित लाईनमनचे असल्याचे सांगत असल्याचे सोनटक्के यांनी सांगितले, तर पथदिव्यासंबंधी लाईनचे काम हे ग्रामपंचायतकडे असल्याचे अरोली महावितरणचे सहाय्यक अभियंता सुहास चौरे यांनी भ्रमणध्वनी वरून सांगितले.
तार तुटल्यावर व पोल पडल्यावर संबंधित ग्रामपंचायत प्रशासन व महावितरण प्रशासन पथदिवे लावण्याची कारवाई करणार का ?असा प्रश्न या रोडवरील अंधाराचे साम्राज्यापासून त्रस्त असणाऱ्या जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी मांडला आहे.