– दोन दिवसात 2.25 लाखाच्या वस्तूंची विक्री
– 8 ऑक्टोबरपर्यंत राहणार खुले
नागपूर :- आज खादी व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदर्शनाचा दुसरा दिवस असून दोन दिवसात 2 लाख 25 हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री झाली आहे. ग्राहकांसोबतच प्रदर्शनी पाहवयास येणाऱ्या प्रेक्षकांची सुध्दा गर्दी वाढत असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या संधीचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान खादी व ग्रामोद्योगी वस्तूंचे राज्यस्तरीय विक्री व प्रदर्शन सीताबर्डी येथील रामगोपाल माहेश्वरी सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याचे एकमेव परिणामकारक माध्यम असून लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. सोबतच ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मंडळ प्रभावी योजना राबवत असून रोजगार निर्मिती हे प्रामुख्याने ध्येय आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकाव धरण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती गरजेची आहे.
प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन
मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. महाबळेश्वर येथील शुद्ध मधुबन मध, वर्धा-नागपूर येथील खादीचे दर्जेदार कपडे, विविध प्रकारचे मसाले, लाकडी घाण्यावरील तेल, लाकडी हस्तकलेच्या वस्तू, फायबर मूर्ती, बांबूच्या कलात्मक वस्तू, आवळा खाद्य पदार्थ, गुळ, बोर,मेणबत्ती आदी वस्तूंचे 62 स्टॉल या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. या प्रदर्शनात भेट देणाऱ्या ग्राहकांसाठी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत नागपुरकरांसाठी नि:शुल्क खुले असणार आहे. ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जास्तीत-जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन वस्तू खरेदी कराव्या, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी केले आहे.