-जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे निर्देश
24 ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहीम
लस न घेणाऱ्या नागरिकांना करणार फोनद्वारे समुपदेशन
भंडारा, दि. 21 : लसीकरणाचे अपेक्षित उद्दिष्ट अद्यापही साध्य न झाल्याने विशेष मोहिमेद्वारे जिल्ह्यातील उर्वरीत लसीकरणाला चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात यावे व ज्या नागरिकांचा अद्यापही दुसरा डोस प्रलंबित आहे. त्या नागरिकांना फोनद्वारे लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज लसीकरणबाबतच्या आढावा बैठकीत दिले.
लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, डॉ. माधूरी माथूरकर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
ओमिक्रॉन विषाणूचा देशात व राज्यात संसर्ग आढळून आला आहे. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत असून सध्यातरी कोरोनावर लस हाच एकमेव पर्याय आहे. लसीकरणामुळे मृत्यूदर कमी आहे. त्यामुळे लसीकरणाला गती द्यावी व शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात 24 ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात यावी व लसीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले.
लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमिक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे. पहिला डोस घेतलेल्या परंतु दुसरा डोस अपूर्ण असलेले व दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्या व्यक्तींचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण शिल्लक आहे. त्याठिकाणी कॅम्पचे आयोजन करावे. 24 ते 31 डिसेंबर दरम्यानच्या कालावधीत रविवारी सुध्दा लसीकरण सुरू ठेवावे. जिल्ह्यात जवळपास 200 लसीकरण केंद्राद्वारे लसीकरण होणार असून कॅम्पच्या अगोदरच्या दिवशी ग्रामीण भागात स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत बैठका घ्याव्यात व लसीकरणाबाबत जनजागृती करावी. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी गावातील नागरिकांना लसीकरणाबाबत समुपदेशन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला परंतू अद्यापही दुसरा डोस घेतला नाही अशा नागरिकांची संख्या मोठी आहे. दुसऱ्या डोससाठी पात्र असूनही लस न घेणाऱ्या नागरिकांना फोनद्वारे माहिती देण्यात यावी यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्ह्यातील विविध कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली व लसीकरण प्रलंबित असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण तातडीने करुन घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.