नागपूर :- शेतक-यांचा सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी, कमी खर्चात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रधानमंत्री कुसूम ‘ब’ सौर कृषी पंप योजना राबवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा आणि तीही मोफत वीज तर मिळणार आहेच पण सौर पंप उभारण्यासाठी अनुदानाचाही हातभार मिळणार आहे.
नागपूर जिल्ह्यात या योजनेंयर्गत 363 शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी मिळाली आहे. तर 204 ग्राहकांनी पैश्याचा भरणा केला असून 35 शेतकऱ्यांकडे सौर पंप बसविण्यात आले आहेत. उर्वरीत शेतक-यांकडे पंप बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अपारंपरिक वीजेच्या माध्यमातून शेतीला शाश्वत पाणी पुरवठा आमच्याकडे उपलब्ध आहे, पीएस कुसूम योजना घटक ‘बी’ यामध्ये शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या केवळ 10 टक्के खर्च करावा लागणार आहे. 60 टक्के अनुदान दिले जाणार असून 25 वर्षांसाठी हा सौर पंप बसवला जाणार असल्याने शेतक-यांना पुढिल 25 वर्ष मोफ़त आणि स्वच्छ वीज दिवसा मिळणार आहे.
शेतकऱ्यांची चिंता मिटणार
सौर पंपामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे. जिल्ह्यात अर्जाचा ओघ वाढलेला आहे. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी पुढील कागदपत्रांचीही पूर्तता करणे गरजेचे आहे. यंत्रणा राबवून अधिक शेतकऱ्यांना फायदा कसा होईल, याचे नियोजन महावितरणकडून केले जात आहे. सौरऊर्जेवर शेतीचे ओलित मोठ्या प्रमाणात होत असल्याचे बघून अनेक शेतकऱ्यांनी आपलीही शेती सौर कृषिपंपाद्वारे ओलित करून वीजसमस्येवर मात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. शासनाची सौर कृषिपंप योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची नांदी ठरावी, अशीच अपेक्षा अनेक शेतक-यांची आहे. सौर कृषिपंपाच्या जोडणीतून शेतकऱ्यांचा वेगाने विकास व्हावा या भावनेतून पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाची ही योजना संजीवनी असून शेती व्यवसायाला बळकटी प्रधान करणारी ठरणार आहे.
यापुर्वी देखील अटल सौर कृषी पंप योजनेत जिल्ह्यात 124 तर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेत 1808 शेतक-यांनी सौर कृषी पंप बसवून दिवसा सिंचनाचा लाभ घेणे सुरु केले आहे. आता प्रधानमंत्री कुसूम ‘ब’ या योजनेतून शेती सिंचनाला सौर कृषिपंपामुळे कलाटणी मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचे दिवसा ओलिताचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे. महावितरणकडे पैसे भरून नवीन वीज जोडणीसाठी तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना यातून आशेचा किरण निर्माण झाला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा आणि ते ही स्वच्छ आणि मोफ़त वीज पुरवठा होत आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा आधारित कृषी पंप उपलब्ध करून दिल्या जात आहे.
कुसुम ‘ब’ योजनेचे फायदे
सौर ऊर्जा ही एक मोफ़त आणि स्वच्छ ऊर्जा असल्याने शेतकऱ्यांना पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर होणारा खर्च कमी करण्यास मदत होणार असून स्वतंत्र सौर पंपमुळे शेतकरी मर्यादीत वीज पुरवठ्याच्या समस्येपासून मुक्त होत आहे. सौर ऊर्जा पर्यावरणपूरक असल्याने प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणाचे संरक्षण होते. याशिवाय या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान मिळते. सोबतच दिवसाच्या वेळी शेतीला सिंचनाकरिता वीज उपलब्ध असते, यामुळे सौर पंप स्थापित करण्याचा खर्च कमी होतो. शेतक-यांनी आजच या योजनेचा लाब घेण्यासाठी नजिकच्या महावितरण कर्यालयाशी अथवा www.mahadiscom.in या संकेतस्थळाल भेट द्यावी, असे आवाहन महावितरनतर्फ़े करण्यात आले आहे.
– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,महावितरण, नागपूर